मुंबई – राज्यात काल, सोमवारी आठवड्याच्या सुरुवातीलाच ११ हजारांनी नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाली होती. ३३ हजार ४७० नव्या कोरोनाबाधितांची वाढ होऊन ८ जणांच्या मृत्यूची नोंद झाली होती. मात्र आज राज्यातील कोरोना रुग्णांची आकडेवारी पुन्हा वाढलेली दिसत आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ३४ हजार ४२४ नव्या कोरोनाबाधितांची भर पडली असून २२ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तसेच आज दिवसभरात १८ हजार ९६७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर गेल्या २४ तासांत राज्यात ३४ ओमिक्रॉनबाधित आढळले आहेत.
आता राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ६९ लाख ८७ हजार ९३८वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख ४१ हजार ६६९ जणांचा मृत्यू झाला असून ६६ लाख २१ हजार ७० जण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ४.७५ टक्के एवढे झाले आहे. तर राज्यातील मृत्यूदर २.०२ टक्के एवढा आहे. सध्या राज्यात २ लाख २१ हजार ४७७ सक्रीय रुग्ण आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७ कोटी ९ लाख २८ हजार ९५४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६९ लाख ८७ हजार ९३८ (९.८५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १४ लाख ६४ हजार ९८७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३ हजार ३२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
राज्यातील ओमिक्रॉनची परिस्थिती?
राज्यात आज दिवसभरात ३४ ओमिक्रॉनबाधितांची नोंद झाली आहे. पुणे मनपामध्ये २५, पुणे ग्रामीणमध्ये ६, सोलापूरमध्ये २, पनवेलमद्ये १ ओमिक्रॉनबाधित आढळले आहेत. राज्यातील एकूण ओमिक्रॉनबाधितांची संख्या १ हजार २८१वर पोहोचली असून आतापर्यंत ४९९ रिकव्हर झाले आहेत.