रत्नागिरी – शालेय विद्यार्थ्यांमध्ये थंडपेय पिण्याचे आकर्षण असते. शाळेच्या आजूबाजूला असलेल्या दुकानांमध्ये जाऊन हे विद्यार्थी थंड पेय पितात.

अनेक वेळा कॅफिन असलेली थंडपेय हे विद्यार्थी पितात. हे विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. म्हणूनच अन्न व औषध प्रशासनाने शाळेच्या परिसरातील दुकानांमध्ये कॅफिन असलेली थंडपेय विकण्यास बंदी घातली आहे.

शाळांच्या परिसरात असलेल्या सर्व दुकानांना भेटी देऊन अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी कॅफिनयुक्त थंडपेय विक्रीसाठी ठेवू नका अशी जनजागृती करत आहेत.

पूर्वीच्या काळात शालेय विद्यार्थी दुकानात जाऊन 1 किंवा 2 रूपयांची पेप्सी पित असतं. अलीकडच्या काळात थंडपेय पिण्याचे आकर्षण विद्यार्थ्यांमध्ये वाढत आहे.

दुरचित्रवाणीवरच्या जाहिरांतीमुळेही थंडपेय पिण्याकडे विद्यार्थी वळत आहे. त्यामध्ये अलीकडे एनर्जी ड्रिंकचेही प्रमाण वाढले आहे.

विद्यार्थी या वयात अज्ञान असतात त्यांना थंडपेयात असलेल्या कॅफिनविषयी माहिती नसते. त्यांना कॅफिनयुक्त थंडपेय पिण्याची सवय जडते.

विद्यार्थ्याच्या आरोग्यासाठी ते हानिकारक होऊ शकते. म्हणूनच अन्न व औषध प्रशासनाने शाळेच्या परिसरातील दुकानात कॅफिनयुक्त थंडपेय विकण्यास बंदी घातली आहे.

पहिल्या टप्प्यात जनजागृती दुसऱ्या टप्प्यात कारवाई

अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी शाळांच्या जवळपास असलेल्या दुकानांमध्ये भेटी देऊन कॅफिनयुक्त थंडपेय न विकण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

काही दुकानदारांकडून कॅफिनयुक्त थंडपेय न विकण्याचे लेखी हमीपत्र घेतले आहे. पहिल्या टप्प्यात जनजागृती केल्यानंतर जर शाळापरिसरातील कोणत्याही दुकानात कॅफिनयुक्त थंडपेय सापडल्यास त्यादुकानादारावर कारवाई होणार आहे.

अन्न व औषध प्रशासनच्या अधिकाऱ्यांनी शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षकांच्या भेटी घेऊन त्यांनाही विद्यार्थ्यांमध्ये कॅफिनयुक्त थंडपेय न पिण्याची जनजागृती करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अल्प कर्मचारी बळ… कारवाईत अडथळे

गेला महिनाभर शाळा परिसरातील दुकानांमध्ये कॅफिनयुक्त पेय न विकण्याबाबत आवाहन सुरू आहे. काही दिवसांनंतर कॅफिनयुक्त पेय विकणाऱ्या दुकानांवर कारवाई सुरू होणार आहे.

सध्या मात्र अन्न व औषध प्रशासनाकडे अत्यल्प कर्मचारी बळ आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी दोन सहाय्यक आयुक्तांची पदे असताना सध्या एकाच सहाय्यक आयुक्तावर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्याचा पदभार आहे.

अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांची रत्नागिरी जिल्ह्यासाठी चार पदे आहेत सध्या मात्र एकच अन्न व सुरक्षा अधिकारी कार्यरत आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांची तीन पदे असून तीनही पदे रिक्त आहेत.

अशावेळी अत्यल्प कर्मचारी बळावर कारवाईची कशी राबवणार हा प्रश्न उपस्थित होत आहे.

शाळांच्या आजूबाजूला असलेल्या दुकानांमध्ये यापुढे कॅफिनयुक्त पेय विकता येणार नाहीत.पहिल्या टप्प्यात आम्ही दुकानदारांना जागरूक करत आहोत.

त्यानंतरही शाळा परिसरातील दुकानांमध्ये कॅफिनयुक्त पेय विकत असल्याचे आढळून आल्यास कारवाई करू.

दिनानाथ शिंदे, सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन रत्नागिरी