विरोधकांचा छळ करण्यासाठी सरकारकडून सक्तवसुली संचलनालयाचा (ईडी) वापर केला जात असल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
संजय राऊत यांनी राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहिलं आहे. यामध्ये त्यांनी महाराष्ट्रात मध्यावधी निवडणूक व्हाव्यात यासाठी सरकार पाडण्याच्या हेतूने काही लोकांनी माझी भेट घेतली होती असाही आरोप केला आहे.
दरम्यान यामध्ये सहभागी होण्यास नकार दिल्याने आपल्याला धमकावलं जात आहे, जेणेकरुन आपण राज्यसभेत मोकळेपणाने बोलू नये असाही आरोप त्यांनी केला आहे.
संजय राऊत राज्यसभेचे खासदार असल्याने त्यांना व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहिलं असून, काही खळबळजनक आरोप केले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत यांच्यावर आरोप होत असून प्रवीण राऊत यांच्यावरील कारवाईवरुनही त्यांच्यावर निशाणा साधला जात आहे.
संजय राऊत यांनी पत्रात एका महिन्यापूर्वी काही लोक महाराष्ट्रातील सरकार पाडण्यासाठी मदत करावी यासाठी आपल्याकडे आले होते.
मध्यावधी निवडणुका व्हाव्यात यासाठी त्यांचा प्रयत्न होता असा दावा केला आहे. मात्र आपण त्यांना मदत केली नसल्याने आपल्यावर कारवाई सुरु असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.