स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतील अभिनेते किरण माने यांच्याबाबत एक धक्कादायक प्रकार समोर आलाय.किरण माने हे आपल्या सोशल मीडियावरील परखड मतप्रदर्शनामुळे नेहमीच चर्चेत असतात. मात्र, आता त्यांना राजकीय भाष्य नडल्याचं पाहायला मिळत आहे. त्यांना ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. यावरून आता उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे, केंद्र सरकारच्या विरोधात मत असू दे किंवा राज्य सरकारच्या विरोधात असू दे, हा त्या व्यक्तीचा अधिकार असल्याचे सामंत यांनी म्हटले आहे.

केंद्र सरकारविरोधात बोलले म्हणून त्यांना कामावरून काढून टाकणे योग्य नसल्याची टीका देखील त्यांनी यावेळी केली. पुढे बोलताना सामंत म्हणाले की, मी त्यांच्या अनेक पोस्ट पाहिल्या आहेत. त्यांनी एसटी संपावर देखील आपले मत मांडले होते. त्यांनी केलेल्या सूचना जर चांगल्या असतील तर त्यावर अंमलबजावणी व्हायला पाहिजे, ते केवळ केंद्र सरकारविरोधात बोलले म्हणून त्यांना कामावरून काढणे कितपत योग्य आहे, असा सवालही यावेळी सामंत यांनी उपस्थित केला आहे.