देशात काही दिवसांपूर्वी आलेल्या करोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर आता पुन्हा करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी निर्बंध कठोर केले आहेत

देशात करोनाने पुन्हा एकदा थैमान घालण्यास सुरुवात केल्याची स्थिती निर्माण झाली आहे. देशात काही दिवसांपूर्वी आलेल्या करोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर आता पुन्हा करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी निर्बंध कठोर केले आहेत. केंद्रीय आरोग्य विभागाने शनिवारी दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत करोनाचे नवे १ लाख ४१ हजार ९८६ रुग्ण नोंदले गेले. त्यानंतर आता रविवारीदेखील देशातील करोनाबाधितांचा आकडा दीड लाखांच्या पुढे गेला आहे.

एका दिवसात सापडलेल्या करोनाबाधितांची ही सर्वात मोठी संख्या आहे. रविवारी १,५९,६३२ नवीन करोना रुग्ण आढळले. त्याच वेळी ४०,८६३ रुग्णही बरे झाले आहेत. दरम्यान, गेल्या २४ तासांत करोनामुळे ३२७ मृत्यू झाले आहेत. दैनिक पॉझिटिव्हीटी रेट १०.२१ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. सध्या देशात सक्रिय रुग्णांची संख्या ३,४४,५३,६०३ आहे. तर ४,८३,७९० लोकांना या संसर्गजन्य आजाराने आपला जीव गमवावा लागला आहे. आतापर्यंत एकूण १५१.५८ कोटी इतके लसीकरण करण्यात आले आहे.

यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील करोनास्थितीचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. केंद्र सरकारमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नरेंद्र मोदी ४.३० वाजता बैठक घेणार असून यावेळी स्थितीचा आढावा घेणार आहेत. यादरम्यान काही महत्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे.

ओमायक्रॉनला सौम्य समजू नका.. ; जागतिक आरोग्य संघटनेचे निर्बंध पालनाचे आवाहन

आग्नेय आशियातील बहुतांश देशांत करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने (डब्लूएचओ) शनिवारी सर्वच देशांना सार्वजनिक आरोग्य आणि सामाजिक उपाययोजनांची कठोर अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले आहे. करोनाचे ओमायक्रॉन हे उत्परिवर्तन हे कमी घातक असल्याचे दिसत असले तरी, ते सौम्य समजून त्याकडे दुर्लक्ष करू नका, असा इशाराही जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या आग्नेय आशियाच्या प्रादेशिक संचालक डॉ. पूनम खेत्रपाल यांनी सांगितले की, सर्वानीच करोना प्रतिबंधक नियमांचे पूर्णपणे पालन करणे आवश्यक आहे. सरकारच्या संबंधित विभागांनी त्या त्या ठिकाणच्या परिस्थितीला अनुरूप अशा उपाययोजना लागू कराव्यात. त्यामुळे विषाणूचा आणखी प्रसार होणार नाही. यात मुखपट्टी, हात धुणे, खोकताना घ्यायची दक्षता, वायूविजनाची व्यवस्था आणि व्यक्तींमध्ये योग्य अंतर राखणे हे उपाय अनिवार्य आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. कोणीही ओमायक्रॉन हा सौम्य विषाणू मानून त्याकडे दुर्लक्ष करता कामा नये, असेही त्यांनी बजावले. जगात पसरत चाललेला हा एक प्रमुख विषाणू आहे. जगभरात त्यामुळे रुग्णालयात दाखल होणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे, तसेच मृत्यूही होत आहेत, असे त्या म्हणाल्या. डेल्टासारखी अन्य उत्परिवर्तनेही सध्या पसरत आहेत. त्यांच्यामुळे गंभीर आजार, मृत्य होतो. करोनाच्या प्रत्येक होकारात्मक अहवालाची गंभीर दखल घेतली पाहिजे, असे खेत्रपाल म्हणाल्या.

जागतिक आरोग्य संघटनेची सूचना

लशीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या लोकांनीही निर्बंधांचे पूर्ण पालन करावे.

लसीकरणाला गती द्यावी, जास्त जोखमीच्या लोकांचे प्राधान्याने लसीकरण करावे.

रुग्णांलयांवर विनाकारण मोठा ताण येणार नाही याची दक्षता घ्यावी. कारण तसे झाल्यास ज्या करोना रुग्णांना गरज आहे, त्यांना वेळीच उपचार मिळणार नाहीत, तसेच करोना व्यतिरिक्त आजारांच्या गंभीर रुग्णांवरही उपचार करून त्यांचे जीव वाचविता येणार नाहीत.