रत्नागिरी दि. ७ : रत्नागिरी जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) बैठक खासदार विनायक राऊत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय सभागृह, रत्नागिरी येथे संपन्न झाली.
या बैठकीस जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विक्रांत जाधव, सर्व तालुका पंचायत समिती सभापती, सर्व नगराध्यक्ष व सदस्य दूरदृष्य प्रणालीद्वारे तर जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदूराणी जाखड, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुशांत खांडेकर तसेच संबधित विभागाचे अधिकारी व सदस्य प्रत्यक्ष उपस्थित होते.
खासदार विनायक राऊत म्हणाले, शासनाच्या योजनांचे काम वेळेत पूर्ण करा. पाणी पुरवठा संदर्भातील योजनांचे काम तात्काळ मार्गी लावा. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी कोरोनाच्या अनुषंगाने शासनाकडून जारी होणाऱ्या आदेशांचे पालन करा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
या बैठकीत खासदार विनायक राऊत यांनी दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजना, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जल जीवन मिशन, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना, स्वच्छ भारत मिशन अभियान, राष्ट्रीय आरोग्य अभियान, राष्ट्रीय कृषी विकास योजना, प्रधानमंत्री फसल बिमा योजना, परंपरागत कृषी विकास योजना (सेंद्रीय शेती), ई-अभिलेख, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना, प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजना आदि योजनांचा आढावा घेतला.