रत्नागिरी दि. ०५ : आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME)” राज्यात सन २०२०-२१ पासून राबविण्यात येत असून ही योजना “एक जिल्हा एक उत्पादन” (ODOP)या आधारावर राबविली जात आहे. त्यानुसार रत्नागिरी जिल्हयाकरिता आंबा पीक निवडण्यात आले आहे. इच्छुक अर्जदारांचे सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगाचे सविस्तर प्रकल्प आराखडे तयार करणे व त्यास बँक कर्ज मंजुरी मिळवण्यास गती देण्यासाठी कृषी विभागामार्फत दिनांक ३ जानेवारी ते १८ जानेवारी या कालावधीत “अन्न प्रक्रिया उद्योगांना बँक कर्ज मंजुरी पंधरवडा” साजरा करण्यात येत आहे. या अनुषंगाने इच्छुक व्यक्ती व गटांनी (स्वयं सहाय्यत गट,शेतकरी उत्पादक कंपनी सहकारी संस्थांनी प्रकल्प उभारणी अर्थ सहाय्यासाठी www.pmime.mofpi.gov.in या MIS पोर्टलवर नोंदणी करून अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, रत्नागिरी यांनी केले आहे. सविस्तर प्रकल्प आराखडे करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा संसाधन व्यक्तींची नेमणूक करण्यात आली असून त्यांना प्रकल्प आराखडे तयार करण्यासाठीचे सेवाशुल्क शासनामार्फत अदा करण्यात येणार आहे. अधिक माहितीसीठी तालुका कृषि अधिकारी/उपविभागीय कृषि अधिकारी / जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. या योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभार्थ्यांना भांडवली गुंतवणूकीकरिता पात्र प्रकल्पखर्चाच्या ३५% कमाल १०.०० लाख रुपये अनुदान देय आहे. तसेच गट लाभार्थी जसे स्वयं:सहाय्यता गट, शेतकरी उत्पादक संस्था व उत्पादक सहकारी संस्था यांना सामाईक पायाभूत सुविधा व भांडवली गुंतवणूक या करिता पात्र प्रकल्पखर्चाच्या ३५% अनुदान देय आहे.या शिवाय इनक्युबेशन सेंटर, स्वयं सहाय्यता गटाच्या सदस्यांना बिज भांडवल, मार्केटींग व ड्रॅन्डींग आणि प्रशिक्षण या घटकांकरिता ही लाभ देय आहे.