खेड व पोलादपूरच्या मृत्युंजय दूतांसाठी स्ट्रेचर वाटप

रत्नागिरी : महामार्गावरील अपघातप्रसंगी घ्यावयाची दक्षता आणि सतर्कता यामुळे अपघातानंतर जखमींचे जीव वाचविले जातात.

चुकीच्या प्रकारच्या रेस्क्यूवर्कमुळे देखील जखमींच्या जीवाशी खेळ होऊ शकतो, असे मत दि रेसिलेन्ट फाऊंडेशन बोईसर- पालघरचे प्रशिक्षक भूपेंद्र मिश्रा यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र राज्य अपर पोलीस महासंचालक वाहतुक मुंबई विभाग डॉ. भूषणकुमार उपाध्याय (भारतीय पोलीस सेवा) यांच्या मार्गदर्शनाखाली हायवे मृत्यूंजय दूत योजनेंतर्गत मृत्यूंजयदुत यांना कशेडी टॅप पोलीसांकडून प्रथमोपचाराबाबत प्रशिक्षण शिबीराचे स्वामी समर्थ मठ कशेडी येथे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी कशेडी टॅप वाहतूक पोलीस उपनिरिक्षक अनिल चांदणे, एएसआय यशवंत बोडकर, शैलेश पालकर मदत ग्रुप आणि मृत्यूंजय देवदुत खेडचे अध्यक्ष प्रसाद गांधी, नूरी उर्फ दादा हयात पीर पालोजी, दीपक उतेकर आदींसह वाहतूक पोलीस स्टाफ आणि मृत्यूंजय देवदुत मोठया संख्येने उपस्थित होते.

या प्रसंगी शैलेश पालकर आणि दि रेसिलेन्ट फाऊंडेशन बोईसर – पालघरचे प्रशिक्षक भूपेंद्र मिश्रा यांच्याहस्ते खेड आणि पोलादपूर येथील मृत्यूंजय देवदुत सदस्यांना स्ट्रेचरचे मोफत वाटप करण्यात आले.

या प्रसंगी दि रेसिलेन्ट फाऊंडेशन बोईसर-पालघरचे प्रशिक्षक भूपेंद्र मिश्रा यांनी रस्ते अपघात, आग, बुडणारी व्यक्ती, मरणासन्न जखमी व्यक्ती, हात अथवा पायाला इजा झालेल्या जखमी व्यक्ती तसेच यांना स्ट्रेचर अथवा उपलब्ध कापडी ब्लँकेटसचा वापर करून जखमींना रूग्णवाहिकेपर्यंत पोहोचविणे, अर्धबेशुध्द व बेशुध्द व्यक्तींना शुध्दीवर आणण्यासाठी सीपीआर देण्याची योग्य पध्दती याबाबत प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले.
कशेडी टॅप वाहतूक पोलीस आणि मृत्यूंजय देवदुत यांनी विविध प्रश्न विचारून दि रेसिलेन्ट फाऊंडेशन बोईसर-पालघरचे प्रशिक्षक भूपेंद्र मिश्रा यांना अपघातप्रसंगी घ्यावयाच्या दक्षतेची माहिती घेतली. याप्रसंगी कशेडी टॅप वाहतूक पोलीस उपनिरिक्षक अनिल चांदणे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले