मुंबई: ओडिशा सरकारने जवाद चक्रीवादळासंदर्भात इशारा दिलाय. ४ डिसेंबर रोजी हे वादळ ओडिशाच्या किनारपट्टीला धडक देणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने किनारपट्टी भागातील १३ जिल्ह्यामधील जिल्हाधिकाऱ्यांना इशारा दिला असून नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात यावं असे आदेश दिलेत. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार दक्षिण अंदमानच्या समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय. बंगालच्या उपसागरातही कमी दाबाचे क्षेत्र आहे. त्याची तीव्रता सध्या वाढत आहे. २ डिसेंबरला त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळाचा जवाद असं नाव देण्यात आलं आहे. सौदी अरेबियाने हे नाव दिलं आहे. जवाद हे वादळ आंध्र प्रदेश आणि ओडिसाच्या किनारपट्टीजवळून जाणार आहे.
आपत्कालीन परिस्थितीन निर्माण झाल्यास तातडीने मदत पोहचता यावी यासाठी ओडिशा सरकारने उपाययोजना केल्या आहेत. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दला, ओडिशा आपत्ती व्यवस्थापन दल आणि अग्निशामन दलाच्या तुकड्यांची मदत घेण्यात येणार आहे.
