80 जणं अडकल्याची भीती
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत सध्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. रायगडमध्ये पावसाने हाहाःकार उडवला असताना मोठी दुर्घटना घडली आहे. दरड कोसळून तब्बल 32 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. महाड तालुक्यातील तळई गावात ही भीषण दुर्घटना घडली. तुफान पावसामुळे 35 घरांवर दरड कोसळली. या भीषण दुर्घटनेनंतर NDRF कडून बचावकार्य सुरु आहे.
नेमकं काय घडलं?
गुरुवारी दुपारी 4 वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडल्याची माहिती आहे. महाड तालुक्यातील तळई गाव हे डोंगर कपारीमध्ये वसलेले आहे. या गावावर दरड कोसळल्याने दरडीखाली 35 घरे दबली गेली. दरड कोसळण्याची घटना घडताच स्थानिकांनी धाव घेऊन मदत कार्यास सुरुवात केली. स्थानिकांनी मातीच्या ढिगाऱ्याखालून 32 जणांचे मृतदेह बाजूला काढले. यात जवळजवळ 80 जण अडकल्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्र्यांची तातडीची आढावा बैठक
गेल्या 24 तासांत अतिवृष्टीमुळे विशेषतः रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांत निर्माण झालेल्या पूर परिस्थितीबाबत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका तातडीच्या बैठकीत आढावा घेतला. हवामान विभागाने पुढील तीन दिवस कोकण किनारपट्टीच्या भागात पावसाचा इशारा सांगितला असून रेड व ऑरेंज अलर्ट दिला आहे.