कोल्हापूर:-पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाचा चांगला जोर पाहायला मिळतोय. सतत पडणाऱ्या पावसामुळे एक पूल वाहून गेला आहे. गारगोटी-कोल्हापूर मार्गावर असलेल्या चंद्रे आणि माजगाव या दोन गावांना जोडणारा हा पूल होता. हा पूल वाहून गेल्याने गारगोटी-कोल्हापूर मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. गारगोटीहून कोल्हापूरला जाणाऱ्या मोठ्या वाहनांना निढोरी मार्गाचा पर्याय देण्यात आला आहे. गारगोटी-कोल्हापूर मार्गावरील ओढ्यावरील पुलाचे बांधकाम गेली कित्येक दिवस सुरू आहे. यामुळे एक कच्चा पर्यायी रस्ता तयार करण्यात आला होता. या भागात बुधवारी मध्यरात्रीपासून पावसाने जोर पकडला असून गेले दोन दिवस मुसळधार पाऊस पडत आहे.