मुसळधार पावसाचा ३२ गावांना धोका, रत्नागिरी जिल्ह्यासाठी एनडीआरएफ च्या दोन टीम करण्यात आल्या सज्ज
रत्नागिरी : कोकणातील सर्व जिल्ह्यात दिनांक ९ ते १२ जून या चार दिवसांच्या काळात हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. १० व ११ जून रोजी सर्वात जास्त म्हणजे सुमारे २०० मीली मीटर पाउस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या येणाऱ्या अस्मानी संकटाचा सामना करण्यासाठी प्रशासनाने आपली यंत्रणा सज्ज केल्याची माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी पत्रकारपरिषदेत दिली आहे. त्यांनी सांगितले कि 32 गावे धोकादायक असून येथील लोकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यास सूचना करण्यात आली आहे. मोठ्या भरतीच्या वेळी खाडी किनारी भागातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जनावरांना देखील सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मोठ्या पावसामुळे अनेकठिकाणी दरड कोसळण्याची शक्यता आहे. सुमारे २० ठिकाणी हा धोका आहे. दरडी कोसळल्यावर रस्ते तातडीने मोकळे करण्यासाठी रस्त्यांवर जेसीबी व इतर यंत्रसामुग्री सज्ज ठेवण्यात आली आहे. हॉस्पिटलमध्ये वीज खंडित होऊ नये म्हणून जनरेटर व्यवस्था करण्यात आली आहे. उघडी गटारे बंद करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत. या दरम्याने साथीचा मोठ्या प्रमाणावर फैलाव होण्याची देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे. मासेमारीवर कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. मातीत पाणी साठून काही वृक्ष उन्मळून पडण्याची देखील शक्यता आहे. रस्ते, पूल यांना देखील धोका पोहचू शकतो यासाठी संपर्क तुटणाऱ्या गावांना अलर्ट करण्यात आले आहे. दोन दिवस परिस्थिती पाहून कर्फ्यू लावण्यात येणार आहे. खाडी भागातील गावातून पाणी घुसण्याची शक्यता आहे. परिस्थितीनुसार महामार्गावर असणाऱ्या पुलावरील वाहतूक बंद केली जाणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यासाठी एनडीआरएफ च्या दोन टीम सज्ज करण्यात आल्या आहेत. पूरप्रवण गावे व दरड प्रवण गावांना देखील अलर्ट करण्यात आले आहे.