मुंबई: राज्यातील करोना संसर्गाचे प्रमाण कमी होताना दिसत आहे. शिवाय, दररोज आढळणाऱ्या करोनाबाधितांपेक्षा करोनातून बरे होणाऱ्यांची संख्यी ही नियमीत जास्त आढळून येत आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारने अनलॉक प्रक्रिया सुरू केली आहे. यासंदर्भातील आदेश शुक्रवारी मध्यरात्री काढण्यात आला आहे. तसेच, करोना परिस्थितीनुसार राज्यातील जिल्हे, महानगर पालिकांची वर्गवारी ५ गटांमध्ये केली गेली आहे. दरम्यान, राज्यात आज तीन महिन्यानंतर प्रथमच सर्वात कमी करोनाबाधित आढळले आहेत. दिवसभरात २१ हजार ७७६ रूग्ण करोनामुक्त झाले असून, १३ हजार ६५९ नवीन करोनाबाधित आढळून आले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ५५,२८,८३४ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले असून, राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९५.o१ टक्के झाले आहे. तर, राज्यात आज ३०० करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.७१टक्के एवढा आहे.