राज्यात लॉकडाउनवरुन सुरु असलेल्या गोंधळावर राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पुन्हा एकदा स्पष्टीकरण दिलं असून आज मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव देण्यात आला असून दुपारपर्यंत अधिसूचना निघेल अशी माहिती दिली आहे. ते नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. राज्यातील १८ जिल्ह्यांतील सर्व निर्बंध हटविण्यात आल्याच्या विजय वडेट्टीवार यांच्या घोषणेने गुरुवारी गोंधळ उडाला होता. यामुळे सारे निर्बंध शिथिल झाले, असं चित्र निर्माण झालं. पण असा कोणताही निर्णयच झाला नसल्याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्री कार्यालयाने दिलं. “अंतिम प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आला असून त्यांची संमती मिळाल्यानंतर अधिसूचना निघेल.जिल्ह्यातील परिस्थितीनुसार ते लागू होईल,” असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे.