भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिलं असून संताप व्यक्त केला आहे. सरकार प्रत्येक गोष्ट केंद्रावर ढकलत आहे. उद्या आदित्य ठाकरेंच्या लग्नासाठीसुद्धा उद्धव ठाकरे पंतप्रधांनांना पत्र लिहतील असा टोला चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना लगावला. यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तोल ढासळलेल्या व्यक्तीवर बोलणं योग्य नाही, त्यांच्यावर उपचार करायचे असतात असा टोला संजय राऊत यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना लगावला आहे.
चंद्रकांत पाटील काय म्हणाले होते –
“महाविकास आघाडीला वाटतं की जनता मूर्ख आहे. गेल्या दीड वर्षांपासून राज्यात मागास आयोग नाही. त्यामुळे इथं केंद्राचा काहीही संबंध नाही. पण हे सरकार कोडगं आहे. उद्या आदित्य ठाकरेंच्या लग्नासाठी मुलगी बघायची असेल तेव्हाही उद्धव ठाकरे पंतप्रधानांना पत्र लिहतील, तुमच्या बघण्यातली दिल्लीतली कोण असेल तर सांगा म्हणून,” अशी खोचक टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
आशिष शेलारांवर अप्रत्यक्ष टीका
राज ठाकरे यांनी मुंबई पालिका निवडणुकीसाठी घाई करु नये असं म्हटलं आहे. यासंबंधी विचारण्यात आलं असता संजय राऊत यांनी आशिष शेलार यांच्यावर निशाणा साधत म्हणाले की, “माझंही तेच म्हणणं आहे. विरोधी पक्ष उगाच घाई का करत आहे. अशा प्रकारचे निर्णय होत असल्याचं त्यांना कोण सांगत आहे. जर त्यांच्या गुप्तहेरांनी बातमी दिली असेल तर ते चुकीची बातमी देत आहेत. असं काही नाही. काही करायचं असेल तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, निवडणूक आयुक्त सांगतील. तुम्ही लोकांच्या मनात संभ्रम का निर्माण करता
फडणवीसांच्या टीकेला उत्तर
“देवेंद्र फडणवीस यांना पुढील तीन वर्ष टीकाच करायची आहे. विरोधी पक्षनेत्यांचं कामच आहे सत्ताधारी नेते, मंत्री यांच्यावर टीका करणं. लोकशाहीत ही टीका स्वीकारली पाहिजे. त्यांनी काय टीका केली माहिती नाही, पण त्यांनी करोना संकटात महागाई, वादळ. मदत योजना यासंदर्भात बोललं पाहिजे. विरोधी पक्षाने महाराष्ट्राच्या हितासाठी सरकारसोबत काम केलं पाहिजे,” असा सल्ला संजय राऊत यांनी दिली आहे.
“फडणवीसांचं दु:ख समजून घेतलं पाहिजे. माझ्यामुळे सत्ता गेल्याची वेदना आहे. मी त्यांचं दु:ख समजतो. त्यामुळे मी त्यांचे आरोप, टीका समजून घेतो,” असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.