रत्नागिरी: १८० नवीन कृषीपंप वीज जोडणी धोरणाला राज्यातील शेतकरी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. आतापर्यंत राज्यातील ५.८२ लाख शेतकऱ्यांनी थकीत कृषीपंपांच्या वीज बिलापोटी ५११ कोटी २६ लाख रुपयांचा भरणा केला. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील ग्राहकांनी ४५ लाख थकबाकी आणि चालु बिलापोटी ४२ लाख असे ८७ लाख रुपये भरणा केला. त्यामुळे ग्रामीण भागात कृषीपंप वीज बील भरण्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्याने राज्यात दुसऱ्या क्रमांकावर मजल मारली आहे. कृषी ग्राहकांना सवलतीसह वीजबिल वसुलीसाठी महावितरणामार्फत ‘ महाकृषी ऊर्जा अभियान ‘ राबवण्यात येत आहे. त्याअंतर्गत आतापर्यंत भरणा करण्यात आलेल्या ५११ कोटी २६ लाख रकमेवर २५६ कोटी रुपयांची सूट देण्यात आली. यापैकी रत्नागिरी जिल्ह्यातील १० हजार ८५७ शेतकऱ्यांनी ही थकबाकी भरली आहे. थकीत वीज बिलापोटी ४५ लाख आणि चालू बिलाचे ४२ लाख असे एकुण ८७ लाख रुपये शेतकऱ्यांनी भरणा केला. ग्रामीण भागात सध्या रत्नागिरी जिल्हा महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकावर आहे. सर्व व्याज व विलंब आकार माफ होणार
राज्यातील ४४ लाख ४४ हजार कृषिपंप ग्राहकांकडे ४५ हजार ७८५ कोटी रुपयांची थकबाकी आहे. या नवीन योजनेमुळे एकूण ३० हजार कोटी रुपयांची सूट देण्यात येणार आहे. तीन वर्षांच्या कालावधीसाठी ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांचे सप्टेंबर २०१५ पूर्वीच्या थकबाकीवरील सर्व व्याज व विलंब आकार माफ होणार आहे.