रत्नागिरी (विशेष प्रतिनिधी): आर्थिक हलाखी आणि अनेक आव्हानांना तोंड देत पत्रकारितेच्या क्षेत्रात स्वतःचे स्थान निर्माण करणारे कु. राजन चव्हाण यांनी नुकत्याच झालेल्या एलएलबी (Bachelor of Laws) परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे रत्नागिरीसह सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
राजन चव्हाण यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण सापुचेतळे येथे झाले. घरची परिस्थिती बेताची असतानाही शिक्षणाची जिद्द आणि काहीतरी करून दाखवण्याची ऊर्मी त्यांच्यात कायम होती. रत्नागिरी येथे महाविद्यालयीन शिक्षणासाठी आल्यानंतर त्यांनी पत्रकारितेसारख्या खडतर क्षेत्रात काम करताना उच्च शिक्षणाचे ध्येय कायम ठेवले. रत्नागिरीच्या भागोजीशेठ कीर लॉ कॉलेजमधून त्यांनी वकिलीचे शिक्षण पूर्ण केले आणि आता एलएलबी परीक्षेत यशस्वीपणे उत्तीर्ण झाले आहेत.
हे यश केवळ वैयक्तिक नसून, कष्ट आणि चिकाटीने कोणतीही परिस्थिती बदलता येते, याचे प्रेरणादायी उदाहरण आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून जनसामान्यांचे प्रश्न मांडताना त्यांनी सामाजिक भान जपले. याचबरोबर, उच्च शिक्षणाची ध्येयनिष्ठा त्यांनी कायम राखली. आपल्या यशाचे श्रेय त्यांनी बहीण योगिता शिवलकर यांना दिले असून, तिच्या पाठिंब्यामुळे आणि प्रेरणेमुळे हे यश शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले.
रत्नागिरी जिल्ह्यातील पत्रकार संघटना, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी चव्हाण यांचे अभिनंदन केले आहे. त्यांच्या भावी कायदेशीर कारकिर्दीसाठी आणि सामाजिक कार्यासाठी सर्वत्र शुभेच्छा देण्यात येत आहेत.