रत्नागिरी : भारतीय जनता पार्टी रत्नागिरी शहर मंडळाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या यशस्वी अकरा वर्षांच्या पूर्णत्वानिमित्त भव्य मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात गेल्या अकरा वर्षांत देशभरात राबविण्यात आलेल्या विकासकामे, लोककल्याणकारी योजना, सुशासन आणि प्रशासनातील क्रांतिकारी बदल यांची सविस्तर माहिती उपस्थितांना देण्यात आली.
या कार्यक्रमाचे आयोजन शहराध्यक्ष दादा ढेकणे यांनी केले असून, जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ. वर्षा ढेकणे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी शहराध्यक्ष दादा ढेकणे आणि महिला शहराध्यक्ष पल्लवी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक श्री. राजेशजी आयरे यांनी उपस्थितांना संबोधित करताना मोदी सरकारच्या अकरा वर्षांच्या कार्यकाळातील महत्त्वाच्या योजनांची माहिती दिली. यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना, स्वच्छ भारत अभियान, उज्ज्वला योजना, आयुष्मान भारत, स्टार्टअप इंडिया, डिजिटल इंडिया, जल जीवन मिशन आणि वंदे भारत एक्सप्रेस यांसारख्या योजनांनी भारतात घडवलेल्या सकारात्मक बदलांचा आढावा त्यांनी मांडला. या योजनांनी सामान्य नागरिकांच्या जीवनात कशाप्रकारे सुधारणा झाल्या, याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली.
या कार्यक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट मोदी सरकारच्या विकासाच्या संकल्पनेची माहिती सामान्य जनतेपर्यंत पोहोचवणे आणि देशहितासाठी भारतीय जनता पार्टीच्या कार्याचा आढावा घेणे हे होते. कार्यक्रमाला भाजपचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये संदीप सुर्वे, निलेश आखाडे, अमित विलणकर, नितीन जाधव, गुरुप्रसाद फाटक, तुषार देसाई, सचिन गांधी, बबलू विलणकर, वैभवी शिवलकर, मुकुंद विलणकर, समीर वस्ता, प्रणाली रायकर, शैलू बेर्डे, प्रवीण रायकर, भक्ती दळी, सायली बेर्डे, सानिका शर्मा, अमेय घुडे, कमलाकर जोशी यांच्यासह अनेक महिला आणि युवक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.
कार्यक्रमात उपस्थित नागरिकांनी मोदी सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेतल्याचे अनुभव शेअर केले. संध्याकाळी ६ वाजता सुरू झालेला हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. नागरिकांनी या कार्यक्रमाचे कौतुक करत भाजपच्या कार्यपद्धती आणि सरकारच्या योजनांबद्दल समाधान व्यक्त केले.
