मुंबई : पहलगाम हल्ल्याच्या १५ दिवसांनंतर भारताने बुधवारी (दि. ७) रात्री पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील (पीओके) ९ दहशतवादी तळांवर ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत हवाई हल्ले केले.
भारतीय हवाई दलाच्या मिराज-२००० आणि सुखोई-३० एमकेआय लढाऊ विमानांनी बहावलपूर, मुरीदके, बाग, कोटली, मुझफ्फराबाद, गुलपुर, भीमबर, चक अमरू आणि सियालकोट येथील दहशतवादी तळांना लक्ष्य करून उद्ध्वस्त केले.
या कारवाईत जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तैयबा यांसारख्या दहशतवादी संघटनांचे मुख्यालय नष्ट झाल्याची माहिती समोर आली आहे.
भारतीय सूत्रांनुसार, या हल्ल्यात ९ दहशतवादी तळ पूर्णपणे उद्ध्वस्त झाले, तर ३ जणांचा मृत्यू आणि १२ जण जखमी झाले.
मात्र, पाकिस्तानमधील स्थानिक वृत्तांनुसार, बहावलपूर येथील हल्ल्यात ३० जणांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानी लष्कराने दावा केला आहे की, भारताने ६ ठिकाणांवर २४ हल्ले केले, ज्यात ८ जणांचा मृत्यू आणि ३३ जण जखमी झाले.
पंतप्रधान मोदींचे ऑपरेशनवर लक्ष
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रात्रभर ‘ऑपरेशन सिंदूर’वर जवळून लक्ष ठेवले. भारतीय हवाई दलाने रात्री १.३० वाजता ही कारवाई सुरू केली, जी पूर्णपणे यशस्वी ठरली.
या हल्ल्यांमुळे पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवादी कारवायांचे कंबरडे मोडल्याचा दावा भारतीय यंत्रणांनी केला आहे.
पाकिस्तानात खळबळ, शाळा-महाविद्यालये बंद
भारताच्या या हवाई हल्ल्यांमुळे पाकिस्तान खडबडून जागे झाले आहे. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील सर्व शाळा आणि महाविद्यालये बुधवारी (दि. ७) बंद ठेवण्यात आली.
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी आज सकाळी १०:३० वाजता राष्ट्रीय सुरक्षा समितीची तातडीची बैठक बोलावली आहे.
लक्ष्य केलेली ठिकाणे
- बहावलपूर
- मुरीदके
- गुलपुर
- भीमबर
- चक अमरू
- बाग
- कोटली
- सियालकोट
- मुझफ्फराबाद
या कारवाईमुळे भारताने दहशतवादाविरुद्ध कठोर पवित्रा घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.