रत्नागिरी : कोकणातून जाणारा मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग गेल्या अनेक वर्षांपासून वाहनचालकांसाठी मृत्यूचा सापळा बनला आहे.

गेल्या पंधरा वर्षांपासून सुरू असलेले या महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम आजही पूर्ण होण्याचे नाव घेत नाही.

मात्र, गेल्या वर्षभरात या महामार्गावर रत्नागिरी जिल्ह्यात तब्बल १३७ वाहनचालकांचा बळी गेला आहे.

महामार्गाच्या अर्धवट कामांमुळे ३९९ पेक्षा जास्त अपघातांची नोंद झाली असून, हा विषय आता गंभीर बनला आहे. 

कोकणाला मुंबईशी जलद गतीने जोडण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला.

या प्रकल्पावर आतापर्यंत कोट्यवधी रुपये खर्च झाले आहेत. तरीही, महामार्गाचे काम अर्धवटच आहे.

कोकणातील चाकरमानी दरवर्षी शिमगोत्सव आणि गणेशोत्सवाला अपघातांच्या भीतीने आपटत-आदळत घरी येत आहेत.

अनेक मंत्र्यांनी या महामार्गाच्या कामाची पाहणी करून वेळेत पूर्ण करण्याची आश्वासने दिली, पण काम पूर्ण होण्याची प्रतीक्षा कायम आहे. 

जानेवारी २०२४ ते फेब्रुवारी २०२५ या कालावधीत रत्नागिरी जिल्ह्यात ३९९ अपघातांची नोंद झाली आहे.

यापैकी १२७ गंभीर अपघातांमध्ये १३७ जणांचा मृत्यू झाला. या आकडेवारीत रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा समावेश केल्यास मृतांचा आकडा हजाराच्या घरात जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

गंभीर अपघातांमध्ये ११५ पुरुष आणि २२ महिलांचा बळी गेला आहे. हे सर्व मृत्यू महामार्गाच्या अर्धवट कामांशी निगडित असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

या कालावधीत ११९ किरकोळ अपघातांमध्ये १९२ जण गंभीर जखमी झाले, यात २१० पुरुष आणि ८२ महिलांचा समावेश आहे.

तसेच, ८९ सामान्य अपघातांमध्ये २६४ जणांना दुखापत झाली, ज्यात १८७ पुरुष आणि ७७ महिलांचा समावेश आहे.

याशिवाय, ६४ अपघातांमध्ये केवळ वाहनांचे नुकसान झाले असून, कोणतीही जीवितहानी झालेली नाही. 

रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर ते रत्नागिरी या भागात सर्वाधिक अपघात झाल्याचे समोर आले आहे.

अपघातांची ही वाढती संख्या चिंताजनक बनली असून, कोकणात पाच मंत्री असतानाही हा प्रश्न सुटण्याचे नाव घेत नाही.

गेल्या अठरा वर्षांपासून पूर्णत्वाच्या प्रतीक्षेत असलेला हा महामार्ग आणखी किती बळी घेणार, असा सवाल कोकणवासियांना पडला आहे.