रत्नागिरी – रत्नागिरीतून काम आटोपून घरी निघालेल्या नाखरे येथील तरुण आंबा उद्योजक चंद्रवदन शैलेंद्र शिंदे-दसूरकर (वय २८) याच्या इलेक्ट्रीक दुचाकीला इको कारची जोरदार धडक बसल्याने झालेल्या भीषण अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला.
हा अपघात बुधवारी दुपारी २:१५ वाजण्याच्या सुमारास पावस-नाखरे रोडवर घडला.
या घटनेने परिसरात शोककळा पसरली असून, चंद्रवदनच्या अकाली निधनाने कुटुंबीय आणि मित्रपरिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रवदन हा काही कामानिमित्त रत्नागिरीत आला होता.
काम उरकून तो आपल्या इलेक्ट्रीक दुचाकीवरून नाखरे येथील घरी परतत होता.
पावस गावापर्यंत पोहोचल्यावर त्याच्या वडिलांचा फोन आला, तेव्हा “मी पावसपर्यंत आलोय, थोड्याच वेळात घरी पोहोचतो,” असे त्याने सांगितले.
मात्र, त्यानंतर काही मिनिटांतच पावस-नाखरे रस्त्यावर समोरून येणाऱ्या इको कारने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
या धडकेत चंद्रवदन रस्त्यावर फेकला गेला आणि रक्ताच्या थारोळ्यात पडला. त्याचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच नाखरे गावचे पोलीस पाटील घटनास्थळी दाखल झाले.
सुरुवातीला चंद्रवदनची ओळख पटली नाही, परंतु त्याची इलेक्ट्रीक दुचाकी पाहून त्यांनी ओळख पटवली.
त्यांनी तातडीने चंद्रवदनच्या कुटुंबीयांना संपर्क साधला. मात्र, अपघाताची तीव्रता सांगण्याचे धाडस कोणालाच झाले नाही.
त्यामुळे “चंद्रवदनचा अपघात झाला आहे, त्याला किरकोळ दुखापत झाली आहे,” असे सांगून कुटुंबीयांना घटनास्थळी बोलावले.
घटनेची माहिती मिळताच चंद्रवदनचे वडील, पत्नी आणि नातेवाईकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली.
तिथे चंद्रवदन रस्त्यावर निपचित पडलेला पाहून सर्वांचा आक्रोश सुरू झाला.
आपल्या पतीला रक्तात पडलेले पाहून पत्नीनेही टाहो फोडला.
हा हृदयद्रावक प्रसंग पाहून उपस्थितांचे काळीज पिळवटून गेले.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चंद्रवदनचा मृतदेह खासगी रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात नेला.
तिथे शवविच्छेदनानंतर सायंकाळी उशिरा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.
चंद्रवदनचा दीड महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. वकिलीचे शिक्षण पूर्ण केलेला हा तरुण यशस्वी आंबा उद्योजक म्हणून परिसरात नावारूपाला आला होता.
त्याच्या अकाली निधनाची बातमी पसरताच जिल्हा रुग्णालयात नातेवाईक आणि मित्रपरिवाराने मोठी गर्दी केली.
या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.