दापोली – दापोली-खेड रस्त्यावर वाकवली येथे सार्वजनिक बांधकाम विभागाने लावलेला दिशादर्शक फलक धोकादायक स्थितीत आहे.
या फलकावरील काही पत्रे गंजून मोडकळीस आले असून, ते धोकादायक स्थितीत लोंबकळत आहेत.
गेल्या पाच दिवसांपासून ही स्थिती असून, याकडे प्रशासनाचे लक्ष गेलेले नाही.

या धोकादायक पत्र्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. विशेषत: दुचाकीस्वारांसाठी हा फलक जीवघेणा ठरू शकतो.
लोंबकळणारे गंजलेले पत्रे कधीही तुटून खाली पडू शकतात, ज्यामुळे मोठा अपघात होऊ शकतो.
या धोकादायक स्थितीची गंभीर दखल घेत भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष अजय शिंदे यांनी तातडीने कारवाईची मागणी केली आहे.
“सोमवार, २४ जुलैपर्यंत जर हे पत्रे हटवण्यात आले नाहीत, तर युवा मोर्चाच्या वतीने हा दिशादर्शक फलक तोडण्यात येईल आणि संबंधित बांधकाम विभागातील कर्मचाऱ्यांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात येईल,” असा इशारा शिंदे यांनी दिला आहे.

या गंभीर समस्येकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने लक्ष देऊन अपघात टाळण्यासाठी आवश्यक ती पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.