मुंबई : महाराष्ट्रात कायद्याचे राज्य राहिलेले नाही, सत्ताधारी पक्षातील लोक दहशत निर्माण करत आहेत. जाती धर्मातील एकोप्याची भावना नष्ट केली जात आहे.

आज विविधतेत एकता या मूळ गाभ्याला धोका निर्माण झाला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात प्रत्येक मंत्री म्हणजे एक नमुना आहे.

अशा मंत्र्यांमुळे राज्यातील सद्भाव, विवेक, महाराष्ट्र धर्म नष्ट होत आहे. भाजप सरकारच्या कार्यपद्धतीमुळे राज्यातील जातीय सलोखा बिघडत आहे, असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

सिंधुदुर्ग येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, कोकणच्या भूमीत एकापेक्षा एक सरस खासदार झाले, ज्यांनी सभ्यता, संस्कृती व लोकशाही मूल्ये कशी असतात याचा आदर्श घालून दिला आहे.

आज त्याच जिल्ह्यातील काही लोकांच्या तोंडातून दररोज गटारगंगा वाहत आहे. एक मंत्री हम करे सो कायदा म्हणतो, दुसरा आमदार सैराट आहे.

आमच्या पक्षात नाही तर निधीच देणार नाही अशी धमकी दिली जाते, हा सर्व प्रकार महाराष्ट्र धर्म नासवण्याचा प्रकार आहे. नारायण राणे हे दुसऱ्या पक्षातून काँग्रेसमध्ये आले ते १२ वर्ष काँग्रेसमध्ये राहिले. त्यातील ९ वर्षे ते सत्तेत राहिले.