वैभववाडी तालुक्यात आज (दि.२३) बुधवारी दुपारनंतर सर्वत्र वीजांच्या कडकडाटासह जोरदार अवकाळी पाऊस झाला. वैभववाडी तालुक्यातील खांबाळे परिसरात सर्वाधिक पावसाची नोंद झाली. या पावसामुळे आंबा, काजू बागायतीचे मोठे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे वैभववाडी शहरात आठवडे बाजारासाठी आलेल्या ग्राहकांची व व्यापाऱ्यांची एकच तारांबळ उडाली. तसेच सध्या शिमगोत्सव सुरु असून या पावसामुळे ग्रामस्थांची तारांबळ उडाली.

या अवकाळी पावसाचा परिणाम आंबा-काजू बागायतीसह सुरंग व्यवसायावर होणार आहे. आधीच शेतकरी बागायतदार निसर्गातील बदलांमुळे चिंतेत असताना वारंवार अवकाळीचे संकट येत असल्याने ते हवालदिल झाले आहेत.