खेड: रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात नारंगी फाटा येथे जनावरांच्या अवैध वाहतुकीच्या संशयावरून दोन गटांमध्ये झालेल्या वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याच्या वेळेनुसार पोलिसांनी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले असून दोन्ही बाजूंकडील व्यक्ती जखमी झाल्या आहेत.
पहिली तक्रार ऋतिक सुनील जाधव (वय २६, रा. चिंचघर/विरार) याने पहाटे ०६.०१ वाजता नोंदवली. ऋतिकच्या तक्रारीनुसार, १३ मे २०२६ रोजी मध्यरात्री १२.३० च्या सुमारास त्याचा भाऊ सुरज सुनील जाधव याला गाडीमध्ये गुरे भरल्याच्या संशयावरून आरोपींनी अडवले. यावेळी झालेल्या वादात ऋुपेश निंबाळकर, रिक्षाचालक चव्हाण आणि खेडेकर यांनी सुरजच्या कपाळावर आणि डोळ्याच्या वर कोणत्यातरी साधनाने प्रहार केला, ज्यामध्ये तो गंभीर जखमी होऊन रक्तस्त्राव झाला. तसेच ऋतिकला बांबूच्या काठीने मारहाण करण्यात आली आणि त्याच्या इतर मित्रांना धक्काबुक्की व शिवीगाळ करण्यात आली. या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता कलम ११५(२), ११८(१), ३५२, ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
त्यानंतर सकाळी ०८.३८ वाजता दुसरी तक्रार प्रसाद प्रकाश बर्गे (वय ३७, रा. चाकाळे हनुमान नगर) यांनी दाखल केली. बर्गे यांच्या सांगण्यानुसार, रात्री ०१.०० च्या सुमारास जनावरांच्या अवैध वाहतुकीबाबत विचारणा केली असता सुरज सुनील जाधव आणि ऋतिक सुनील जाधव यांनी त्यांच्याशी वाद घातला. ऋतिक जाधव याने लोखंडी पाईपने बर्गे यांच्या कंबरेवर प्रहार केले आणि त्यांना पुलावरून ढकलून दिले, ज्यामुळे त्यांच्या उजव्या पायाच्या टाचेला गंभीर दुखापत झाली. तसेच आरोपींनी त्यांचे सहकारी प्रवीण कदम यांनाही मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी सुरज आणि ऋतिक जाधव यांच्यावर भारतीय न्यायसंहिता कलम ११५(२), ११८(१), ३५१(३), ३(५) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. खेड पोलीस या दोन्ही प्रकरणांचा सखोल तपास करत आहेत.

