पालकमंत्री उदय सामंत आणि राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते दापोलीत जिल्हास्तरीय प्रदर्शनाचे उद्घाटन

दापोली (रत्नागिरी): महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत (उमेद) दापोली येथे जिल्हास्तरीय सरस प्रदर्शन आणि विक्री सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले.

या प्रदर्शनात रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विविध स्वयंसहाय्यता समूहांतील (बचत गट) महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यात आली.

या कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत आणि राज्याचे गृहराज्य मंत्री ना. योगेश कदम यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.

दापोलीतील या प्रदर्शनात महिलांनी तयार केलेल्या विविध खाद्यपदार्थ, घरगुती मसाले, ग्रामीण कलाकुसरीच्या वस्तू, आंबा-काजूचे विविध प्रक्रिया केलेले पदार्थ, तसेच कोकणी मेवा यांसारख्या स्थानिक उत्पादनांचे स्टॉल्स लावण्यात आले होते.

ना. उदय सामंत आणि ना. योगेश कदम यांनी प्रत्येक स्टॉलला भेट देऊन महिलांशी संवाद साधला आणि त्यांच्या उत्पादनांची माहिती घेतली.

महिलांच्या कल्पकतेला आणि कौशल्याला पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले.

यावेळी बोलताना पालकमंत्री ना. उदय सामंत म्हणाले,

ना. उदय सामंत

ग्रामीण भागातील महिलांमध्ये प्रचंड क्षमता आहे. ‘उमेद’च्या माध्यमातून या महिलांना योग्य व्यासपीठ मिळाल्याने त्यांची उत्पादने थेट ग्राहकांपर्यंत पोहोचत आहेत. यामुळे महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळत आहे. महिलांनी उद्योजकतेच्या क्षेत्रात पुढे येण्यासाठी ‘उमेद’च्या विविध योजनांचा लाभ घ्यावा. महिला सक्षमीकरणासाठी शासन नेहमीच त्यांच्या पाठीशी आहे.


ना. योगेश कदम यांनी आपल्या भाषणात महिलांच्या परिश्रमाचे आणि जिद्दीचे कौतुक केले. ते म्हणाले,

ना. योगेश कदम

या प्रदर्शनात महिलांनी तयार केलेली उत्पादने पाहून मला खूप आनंद झाला. ग्रामीण भागातील महिलांमध्ये आत्मविश्वास आणि कौशल्य आहे. ‘उमेद’ने त्यांना योग्य संधी दिली आहे. महिलांनी आपल्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी प्रयत्न करावेत. शासन त्यांना सर्वतोपरी मदत करेल.

या कार्यक्रमाला रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदही रानाडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

महिला बचत गटातील सदस्यांनी मोठ्या संख्येने या प्रदर्शनाला भेट दिली, ज्यामुळे कार्यक्रमाला विशेष उत्साह आणि रंगत आली.

“उमेद” च्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी होत असलेले प्रयत्न निश्चितच प्रेरणादायी आहेत.

महिलांनी या संधीचा लाभ घेऊन आपल्या व्यवसायाला नवी दिशा द्यावी, असे आवाहन ना. उदय सामंत आणि  ना. योगेश कदम यांनी केले.

या प्रदर्शनामुळे ग्रामीण भागातील महिलांना त्यांच्या उत्पादनांसाठी एक चांगली बाजारपेठ मिळाली आहे, तसेच त्यांना त्यांच्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी प्रोत्साहन मिळाले आहे.

– Advertisement