मुंबई: राज्याच्या जलदी क्षेत्रात पावसाळी मासेमारी बंदीचा कालावधी वाढवण्यात आला असून, आता १ जून ते १५ ऑगस्ट या कालावधीत मासेमारीवर बंदी असणार आहे.
मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी विधानसभेत ही महत्त्वाची घोषणा केली.
माशांच्या साठ्याचे जतन करण्यासोबतच मच्छीमारांच्या जीविताचे व वित्ताचे रक्षण व्हावे, या मुख्य हेतूने मासेमारी बंदीचा कालावधी १५ ऑगस्टपर्यंत वाढवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असल्याचे त्यांनी सभागृहात स्पष्ट केले.
सध्याच्या नियमांनुसार, केंद्र व राज्य शासनाच्या आदेशान्वये १ जून ते ३१ जुलै असा ६१ दिवसांचा पावसाळी मासेमारी बंदी कालावधी लागू असतो.
या काळात राज्याच्या जलदी क्षेत्रात यांत्रिक व यंत्रचालित मासेमारी नौकांना पूर्णपणे बंदी असते.
मात्र, मासेमारी हंगामाच्या सुरुवातीलाच मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या लहान माशांच्या मासेमारीला अटकाव करण्यासाठी हा बंदी कालावधी १५ ऑगस्टपर्यंत वाढवावा, अशी मागणी विविध मच्छीमार सहकारी संस्थांकडून सातत्याने केली जात होती.
गुजरात आणि महाराष्ट्र या शेजारील राज्यांमध्ये मासेमारी बंदीच्या कालावधीत एकसूत्रता असणे अत्यंत गरजेचे आहे; अन्यथा इतर राज्यांतील नौका दुसऱ्या राज्याच्या जलदी क्षेत्रात घुसून बेकायदेशीर मासेमारी करण्याची शक्यता नाकारता येत नाही, याकडे मंत्री नितेश राणे यांनी लक्ष वेधले.
मच्छीमारांकडून प्राप्त झालेल्या निवेदनाच्या अनुषंगाने जिल्हा समिती, राज्य सल्लागार व सहनियंत्रण समितीकडून अहवाल मागवण्यात आले होते. या समित्यांनीही पावसाळी बंदीचा कालावधी १ जून ते १५ ऑगस्टपर्यंत निश्चित करण्याबाबत आपले सकारात्मक अभिप्राय दिले असल्याची माहिती नितेश राणे यांनी सभागृहाला दिली.

