रत्नागिरी: जिल्हा महिला मोर्चा रत्नागिरी दक्षिण कार्यकारिणीची बैठक आज उत्साहात आणि सकारात्मक वातावरणात पार पडली. महिला मोर्चा रत्नागिरी दक्षिणच्या जिल्हाध्यक्षा वर्षा परशुराम ढेकणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस भाजप रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव प्रमुख उपस्थित होते.

या बैठकीला महिला मोर्चाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्या आणि विविध मंडळांतील महिला प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.

बैठकीत प्रामुख्याने संघटनात्मक कामकाजाचा आढावा घेण्यात आला. यामध्ये आगामी काळातील पक्षाचे कार्यक्रम, महिला सक्षमीकरण, बूथ सक्षमीकरण, जनसंपर्क अभियान तसेच पक्षाची विचारधारा अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविण्यासंदर्भात सविस्तर चर्चा झाली.

उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपापल्या भागातील विविध प्रश्न, सूचना आणि संघटनात्मक बाबी मांडल्या. या सर्वांचे म्हणणे वर्षा परशुराम ढेकणे आणि जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी ऐकून घेतले व त्यावर योग्य मार्गदर्शन करून आवश्यक सूचना दिल्या.

यावेळी प्रशांत यादव यांनी कार्यकर्त्यांना पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी अधिक जोमाने काम करण्याचे आवाहन केले. तर वर्षा परशुराम ढेकणे यांनी महिला मोर्चाच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याने आणि कार्यकर्तीने जनतेशी सातत्याने संपर्क ठेवत शासनाच्या जनकल्याणकारी योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सक्रियपणे कार्य करावे, असे सांगितले.

या बैठकीमुळे महिला मोर्चाच्या कार्याला नवी दिशा मिळाली असून आगामी काळात अधिक जोमाने संघटन वाढविण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला.

या बैठकीमध्ये जिल्हा सरचिटणीस नपुरा मुळे, श्रुती ताम्हणकर, उपाध्यक्ष संगीता कवितके, स्नेहा चव्हाण, रूपाली कदम, शितल रानडे, मंडळ अध्यक्ष सुचिता नाचणकर, शहराध्यक्ष भक्ती दळी, सुयोग जठार, ध्रुवी लाकडे, सुप्रिया बेंद्रे, वैदही बने, आदिती गुडेकर आणि रावी मोरे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या.