कोरोनाबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी सरकारने विविध पर्याय अवलंबले होते.मागच्या दोन वर्षांपासून प्रत्येक फोनमध्ये कोरोनाची कॉलर ट्यून ऐकू येत आहे.

कॉल करताना नेहमीच कोरोनापासून बचावाचा संदेश ऐकायला मिळतो, मात्र आता या कॉलर ट्यूनला अनेक लोक वैतागली आहेत.

आता लवकरच या कॉलर ट्यूनपासून सुटका होऊ शकते. केंद्र सरकार कोरोनाची ही कॉलर ट्यून बंद करण्याचा विचार करत आहे. सरकारला असे अनेक अर्ज प्राप्त झाले आहेत. ज्यामध्ये असे म्हटले आहे की, या कॉलर ट्यूनचा उद्देश पूर्ण झाला आहे. काहीवेळा आपत्कालीन परिस्थितीत महत्त्वाचे कॉल्स करताना या कॉलर ट्यूनमुळे उशीर होतो.

याबाबत माहिती देताना अधिकृत सूत्रांनी सांगितले की, दूरसंचार विभागाने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला पत्र लिहून ही कॉलर ट्यून काढून टाकण्याची विनंती केली आहे. त्यात सेल्युलर ऑपरेटर असोसिएशन ऑफ इंडिया तसेच मोबाइल ग्राहकांकडून प्राप्त झालेल्या अर्जांचा उल्लेख आहे.