रत्नागिरी : तालुक्यातील वाटद खंडाळा येथील बहुचर्चित तिहेरी खून प्रकरणात जयगड पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील यांच्यावर कर्तव्यात कसूर केल्याचा आरोप करत त्यांच्या बडतर्फीसाठी सामाजिक कार्यकर्त्या संध्या कोसुंबकर आणि वंदना जंगम यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सुरू केलेले आमरण उपोषण सलग सहाव्या दिवशीही सुरू राहिले आहे.
१५ ऑगस्टपासून आंदोलन छेडणाऱ्या कोसुंबकर यांनी पोलीस अधिकाऱ्याची बडतर्फी होईपर्यंत उपोषण मागे न घेण्याचा निर्धार व्यक्त केला असून, यापुढे कोणतीही वैद्यकीय मदत घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे.
वाटद खंडाळा येथील तिहेरी हत्याकांडातील मुख्य आरोपी दुर्वास पाटील याने यापूर्वी सिताराम वीर याला बेदम मारहाण करून त्याचा खून केला होता.
या घटनेची माहिती संपूर्ण गावात उघड असतानाही जयगड पोलीस ठाण्यातील कुलदीप पाटील यांनी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले, ज्यामुळे आरोपींचे धाडस वाढले आणि त्यानंतर तिहेरी खुनाची गंभीर घटना घडली, असा थेट आरोप संध्या कोसुंबकर यांनी केला आहे.
संबंधित अधिकाऱ्यावर कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन तीव्र ठेवण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.

