मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने आयोजित केलेली शोकसभा

रत्नागिरी : काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या २६ निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि या क्रूर कृत्याचा तीव्र निषेध करण्यासाठी मराठी पत्रकार परिषद, रत्नागिरी यांच्या वतीने शनिवारी सावरकर नाट्यगृह प्रांगणात शोकसभेचे आयोजन करण्यात आले.

या शोकसभेला शेकडो रत्नागिरीकर, विविध शासकीय कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, माजी सैनिक, राजकीय नेते, मेडिकल कॉलेज आणि नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी उपस्थित होते.

पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी ऑनलाइन संवाद साधत शोक व्यक्त केला आणि दहशतवादाविरोधात एकजुटीचे आवाहन केले.

पालकमंत्री उदय सामंत म्हणाले, “या हल्ल्याला जबाबदार असणाऱ्या दहशतवादी प्रवृत्तीला ठेचून काढू. सर्व नागरिकांनी एकता दाखवून विश्वास वृद्धिंगत करावा. केंद्र सरकार या हल्ल्याला प्रत्युत्तर देईल आणि येणाऱ्या काळात दहशतवादावर कठोर कारवाई करेल.” 

पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले, “पहलगाम येथील हल्ल्यात २६ निष्पाप भारतीयांचा मृत्यू झाला, ही अत्यंत गंभीर बाब आहे.

आज आपण सर्वजण एकत्र येऊन श्रद्धांजली अर्पण करत आहोत, हीच आपली एकतेची ताकद आहे. अशा घटनांविरोधात आपण एकजुटीने लढले पाहिजे.”

शोकसभेला कर्नल प्रशांत चतुर, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, तहसीलदार राजाराम म्हात्रे, बशीर मुर्तुजा, राहुल पंडित, बिपीन बंदरकर, वाहन निरीक्षक (आरटीओ कार्यालय), माजी सैनिक, विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, सर्व राजकीय पक्षांचे नेते, मेडिकल कॉलेज आणि जिल्हा शासकीय रुग्णालयातील नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी उपस्थित होते. ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम्’च्या घोषणांसह शहीदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. मराठी पत्रकार परिषद, रत्नागिरीची संपूर्ण टीम या प्रसंगी उपस्थित होती.