दापोली: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळाच्या 63 व्या अधिवेशनाचे उद्घाटन कोकण कृषी विद्यापीठातील सर विश्वेश्वरय्या सभागृहात थाटात संपन्न झाले. या सोहळ्यास स्वागताध्यक्ष राज्यमंत्री योगेश कदम, अधिवेशनाचे अध्यक्ष सुनील पंडित, कोकण विभागाचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, महामंडळाचे अध्यक्ष तानाजी माने यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि प्रतिमा पूजनाने झाली. स्वागताध्यक्षीय भाषणात राज्यमंत्री योगेश कदम म्हणाले, “महाराष्ट्रातील एकही मराठी माध्यमाची प्राथमिक किंवा माध्यमिक शाळा बंद पडू देणार नाही. यासाठी वैयक्तिक लक्ष घालून आवाज उठवेन. शांत वाटलो तरी वेळप्रसंगी रौद्ररूप दाखवण्यास कमी करणार नाही.”

त्यांनी पुढे सांगितले की, टप्पा अनुदानासाठी विशेष प्रयत्न सुरू असून, विनाअनुदानित शिक्षकांना अनुदान मिळावे यासाठी सरकार सकारात्मक आहे. “सरकारची आर्थिक स्थिती उत्तम आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. ज्याप्रमाणे लाडक्या बहिणींचा विचार सरकार करते, त्याचप्रमाणे विद्यार्थी आणि शिक्षकांचाही विचार केला जात आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

कोकणातील नवीन संचमान्यतेमुळे शाळांना बसणारा फटका टाळण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून उपाययोजना केल्या जातील, असे आश्वासन कदम यांनी दिले.

यासाठी मुख्याध्यापक महामंडळाने तत्काळ पत्र द्यावे, त्याचा पाठपुरावा करण्याचे शब्द त्यांनी दिले. शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनीही शिक्षण क्षेत्रातील बदलत्या निर्णयांचा शिक्षक-विद्यार्थ्यांवर होणारा परिणाम अधोरेखित करत शिक्षकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची ग्वाही दिली.

या सोहळ्यास महामंडळाचे माजी अध्यक्ष सुभाष माने, अरुण थोरात, जे.के. पाटील, उपाध्यक्ष सचिन नलावडे, आर.व्ही. पाटील, गोपाल पाटील, डी.एस. घुगरे, रत्नागिरी जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष आयुब मुल्ला, उपाध्यक्ष संजय चव्हाण, सचिव महेश पाटकर, सहसंपादक रमेश तरवडेकर आदी उपस्थित होते. अधिवेशनाध्यक्ष सुनील पंडित यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.

कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघातर्फे ‘महाराष्ट्रात सीबीएससी पॅटर्न: केंद्रीय व राज्य शिक्षण मंडळ तुलनात्मक अभ्यास’ या विषयावर निबंध सादर करण्यात आला. महामंडळातर्फे ‘रत्नसागर’ स्मरणिकेचे आणि ‘एज्युकेशन जर्नल’चे प्रकाशन झाले. माजी अध्यक्ष जे.के. पाटील यांनी या सत्राचे अध्यक्षपद भूषवले. दुपारच्या सत्रात पदाधिकाऱ्यांचा सत्कार आणि नियमक मंडळाची सभा झाली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राज्य कोषाध्यक्ष संदेश राऊत यांनी केले, तर सचिव नंदकुमार सागर यांनी आभार मानले.