रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी जिल्ह्यातील विकासकामांना गती देताना आता शहर विद्रुपीकरणाला कारणीभूत ठरणाऱ्या अनधिकृत आणि अनावश्यक होर्डिंग्स काढण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

ना. उदय सामंत यांच्या नियुक्तीपासून रत्नागिरी जिल्ह्यात विकासाची गंगा अवतरली असून, उद्योग आणि पर्यटन क्षेत्रातही मोठी प्रगती होताना दिसत आहे.

ना. उदय सामंत यांच्याकडे उद्योग खाते असल्याने रत्नागिरी जिल्ह्यात कोट्यवधींची गुंतवणूक येत आहे. यामुळे जिल्हा उद्योगाच्या बाबतीत कात टाकत असून, लवकरच अपेक्षेपेक्षा जास्त उद्योग येण्याची शक्यता आहे.

यासोबतच, वाढत्या उद्योगांमुळे पर्यटकांची संख्याही वाढणार असल्याने ना. सामंत यांनी पर्यटन स्थळांचा विकास करण्यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे.

अनेक पर्यटन स्थळे विकसित झाली असून, काही विकासाच्या मार्गावर आहेत.

पर्यटन वाढीसाठी त्रासदायक ठरणाऱ्या अनधिकृत आणि अनावश्यक होर्डिंग्सवर आता ना. उदय सामंत यांनी कठोर कारवाईचा निर्णय घेतला आहे.

ही होर्डिंग्स केवळ शहराचे सौंदर्य बिघडवत नाहीत, तर पर्यटक आणि स्थानिक नागरिकांना त्रासदायक ठरतात. शिवाय, अशा होर्डिंग्समुळे मोठ्या अपघातांचा धोकाही वाढतो.

या सर्व बाबींचा विचार करून ना. सामंत यांनी रत्नागिरी शहरासह जिल्ह्यातील सर्व अनधिकृत आणि अनावश्यक होर्डिंग्स काढण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

हा निर्णय रत्नागिरी जिल्ह्याच्या भविष्यकालीन विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे. यामुळे शहराचे सौंदर्य वाढण्यासह पर्यटनाला चालना मिळेल आणि नागरिकांचे जीवन सुरक्षित होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.