
रत्नागिरी : शहराच्या फाटक हायस्कूलमधील इयत्ता सहावीची विद्यार्थिनी स्पृहा तेजराज भावे हिने बृहन्मुंबई विज्ञान शिक्षक संघटनेच्या वतीने आयोजित डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा २०२५-२६ मध्ये सुवर्णपदक पटकावले आहे.
संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातून सुवर्णपदक मिळवणारी ती एकमेव विद्यार्थिनी ठरली आहे.
ही स्पर्धा लेखी परीक्षा, प्रात्यक्षिक, कृती संशोधन अहवाल आणि मुलाखत अशा चार कठीण टप्प्यांत पार पडली. देशभरातून सुमारे एक लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला होता.
यावर्षीच्या स्पर्धेसाठी ‘पृथ्वी प्रणाली आणि मानवी हस्तक्षेप’ ही संकल्पना देण्यात आली होती. स्पृहाने ‘शाश्वत शेती आंब्याची दिशा कोकणच्या विकासाची’ या विषयावर आपला प्रकल्प सादर केला.

यामध्ये तिने रासायनिक खतांचे दुष्परिणाम मांडून सेंद्रिय आणि नैसर्गिक पद्धतीने आंबा शेती कशी फायदेशीर ठरेल, यावर सखोल संशोधन केले.
या प्रकल्पासाठी तिला विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ, कृषी अधिकारी आणि बागायतदारांचे मार्गदर्शन लाभले.
५ एप्रिल २०२६ रोजी मुंबईत झालेल्या समारंभात डीआरडीओचे माजी सहसंचालक डॉक्टर ए. जी. नगरकर यांच्या हस्ते स्पृहाला हे सुवर्णपदक प्रदान करण्यात आले.
तिच्या या यशाबद्दल रत्नागिरी जिल्ह्यातून तिचे कौतुक होत आहे.

Leave a Reply