मुंबई (प्रतिनिधी) : शिवसेनेचे संपर्कप्रमुख सुधीर मोरे यांचा मृतदेह घाटकोपर रेल्वे स्टेशनच्या परिसरात आढळल्याने खळबळ माजली आहे. सुधीर मोरे यांचा त्या परिसरामध्ये चांगलाच धबधबा होता. अशात त्यांचा मृतदेह सापडणं ही गंभीर घटना आहे. याची उच्चस्तरीय चौकशी होणं आवश्यक आहे. सुधीर मोरे यांचा खून झाला आहे की, त्यांच्या मृत्यूमागे आणखी काही कारण आहे, याबद्दलचा वेगवान तपास होणं गरजेचं आहे

सुधीर मोरे यांनी अल्पावधीतच राजकारणामध्ये आपली पकड मजबूत केली होती. रत्नागिरी जिल्ह्याचे ते गेल्या अनेक वर्षांपासून संपर्कप्रमुख होते. सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची साथ सोडली नाही. राजकारणामध्ये अत्यंत सक्रियपणे ते विरोधकांना टक्कर देत होते. यंदा ते विधानसभा निवडणूक लढवण्याची देखील शक्यता होती. त्यांच्या अशा प्रकारे जाण्यानं कार्यकर्त्यांच्या मनाला मोठा हादरा बसला आहे. सुधीर मोरे यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला आहे, याचा तपास सुरू आहे. सध्या याविषयी कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध होत नाहीये.

सुधीर मोरे हे तसे वरिष्ठ पदाधिकारी असल्यामुळे सहसा ते एकटे कुठेही जात नव्हते. पण घाटकोपर रेल्वे स्टेशनवर ते एकटे का गेले? त्यांना कोणाचा फोन आला होता का? कोणी त्यांना भेटायला बोलावलं होतं का? असे सवाल उपस्थित होत आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री जेवणानंतर ते घाटकोपर रेल्वे स्टेशन कडे गेले होते.एवढ्या रात्री एकट्याला जायला ते का तयार झाले या घटनेचा तपास अत्यंत बारकाईने होणे आवश्यक आह. सुधीर मोरे यांचा खून झाला आहे की अजून काही याची माहिती मिळणं आवश्यक आहे.

मुंबई आणि कोकणामध्ये ते अत्यंत सक्रियतेने काम करताना दिसत असत. काल रात्री मुंबईमध्ये गणपतीच्या एका मीटिंगसाठी ते उपस्थित होते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. सगळं ठीक चालत असताना अचानकपणे त्यांच्या मृत्यूची बातमी येणे धक्कादायक घटना आहे, असं त्यांच्या जवळच्या व्यक्तींकडून कळत आहे.

पोलीसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे लवकरच याबाबत ठोस माहिती उपलब्ध होईल, अशी माहिती देण्यात आली आहे.