रत्नागिरी : शहरात आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून मध्यवर्ती बस स्थानक, मारुती मंदिर, आरोग्य मंदिर, साळवी स्टॉप आणि रेल्वे स्टेशन परिसरात ऑटो-रिक्षा भाडे दरपत्रकाचे फलक लावून प्रवाशांना मीटरप्रमाणे भाडे आकारण्याचे व सौजन्याने वागण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मात्र, केवळ दोनशे रुपयांचे फलक लावून प्रशासनाने आपली जबाबदारी झटकल्याची तीव्र प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे. रिक्षाचालक नियमांची पायमल्ली करत मीटरप्रमाणे भाडे न आकारता प्रवाशांची आर्थिक पिळवणूक करत असून विरोध केल्यास अरेरावी करत आहेत.
विशेषतः रेल्वे स्टेशन हा भाग शहराबाहेर असल्याचे कारण पुढे करत नियम लागू होत नसल्याचे सांगत हात वर केले जातात. रेल्वे स्टेशन पासून मुख्य रस्त्यापर्यंत जायचं असेल तरी ते पन्नास रुपये घेतात. आणि जर कोणी विरोध केला तर वरील कारण सांगतात मीटर बिटर कायदा बियदा काय नाय?
प्रशासनाकडून केवळ सणासुदीच्या काळात औपचारिकता म्हणून मोहीम राबवली जात असून प्रवाशांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यालयाचा संपर्क क्रमांक किंवा नोडल ऑफिसरचा नंबर फलकावर उपलब्ध करून दिला जात नाही.

प्रवाशांच्या सुरक्षेसाठी व प्रवासाची कोणतीही पर्यायी सोय नसल्याने प्रवाशांना नाइजालास्तव जादा भाडे देऊन प्रवास करावा लागत आहे.
या पार्श्वभूमीवर केवळ फलकबाजी न करता आरटीओ प्रशासनाने प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून ठोस कारवाई करावी आणि रिक्षाचालकांची मनमानी रोखावी, अशी संतप्त मागणी रत्नागिरीतील प्रवाशांकडून होत आहे.

