हवामान विभागाची माहिती

रत्नागिरी : राज्याबरोबरच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रात्रीपासूनच मुसळधार पाऊस कोसळत आहे. सामान्यांचं जनजीवन या पावसामुळं जरी विस्कळीत झालं असलं तरी शेतकरी वर्गात मात्र आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे.

काही दिवसापासून पावसानं दडी मारल्यानं भात शेती पिवळी पडू लागली होती. शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र, या पावसामुळे पिकांना जीवदान मिळालं आहे.

दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार गेल्या 24 तासात रत्नागिरी जिल्ह्याती दापोलीमध्ये रेकॉर्ड ब्रेक पावसाची नोंद झाली आहे. मागील 24 तासात दापोलीत 245 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

जगबुडी नदीच्या पाणी पातळीत वाढ, नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून पावसाची संततधार सुरु आहे. पुढील दोन दिवस हवामान विभागानं जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. गेले दोन दिवस पडत असलेल्या पावसामुळं खेडमधील जगबुडी नदी इशारा पातळीवरुन वाहत आहे. त्यामुळं तेथील प्रशासन सतर्क झालं असून, नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

पाहुयात गेल्या 24 तासात कुठं किती पावसाची नोंद झाली.

नाशिक – 69.6 – मिलिमीटर
नांदेड – 16.2 – मिलिमीटर
जळगाव – 35 – मिलिमीटर
पुणे – 11.8 – मिलिमीटर
कुलाबा – 52.8 – मिलिमीटर
ठाणे – 58.6 – मिलिमीटर
दापोली – 245 – मिलिमीटर
जालना – 22 – मिलिमीटर
रत्नागिरी – 188 – मिलिमीटर
माथेरान – 87.6 – मिलिमीटर
परभणी – 6.7 – मिलिमीटर