रत्नागिरी: शिर्के प्रशालेत विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी घेतली अमली पदार्थविरोधी शपथ

रत्नागिरी: रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या रा.भा. शिर्के प्रशालेत ‘अमली पदार्थांचे दुष्परिणाम’ या विषयावर विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

१९ जुलै २०२५ रोजी जिल्हा माध्यमिक व प्राथमिक शिक्षण विभाग तसेच राज्य शासनाच्या मार्गदर्शनाखाली रंजन मंदिर येथे आयोजित कार्यक्रमात विद्यार्थी आणि पालकांना अमली पदार्थांचे आरोग्य आणि समाजावरील दुष्परिणाम समजावून सांगण्यात आले.

प्रशालेच्या स्काऊट-गाईड विभाग आणि प्रहारी गट प्रमुख प्रशांत जाधव यांनी दृकश्राव्य माध्यमातून अमली पदार्थांचे दुष्परिणाम प्रभावीपणे पटवून दिले. यावेळी सर्व उपस्थित विद्यार्थी आणि पालकांनी अमली पदार्थमुक्तीची शपथ घेतली.

शिर्के प्रशालेची ७५ वर्षांहून अधिक काळाची शिस्तबद्ध आणि अभ्यासमय वातावरणाची परंपरा आहे. येथील विद्यार्थी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवत आहेत.

पाच विद्यार्थ्यांना मानाचा शिवछत्रपती पुरस्कार मिळाला असून, अनेक माजी विद्यार्थी विविध महत्त्वाच्या क्षेत्रात कार्यरत आहेत.

याचे श्रेय रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी, विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना आहे, असे मुख्याध्यापक के.डी. कांबळे यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, “ही उज्ज्वल परंपरा कायम ठेवण्याची जबाबदारी आपणा सर्वांची आहे. अमली पदार्थांसारख्या समाजविघातक गोष्टी हद्दपार करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करूया.”

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ए.पी. चव्हाण यांनी केले, तर आभारप्रदर्शन एम.व्ही. जाधव यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

यावेळी उपमुख्याध्यापिका पी.एम. पवार, पर्यवेक्षिका पी.एस. काजरेकर यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*