रत्नागिरी : नव्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली असताना रत्नागिरी जिल्ह्यातील प्राथमिक शाळांच्या दुरुस्तीच्या कामांना गती मिळाली आहे. जिल्हा नियोजन समितीने सन २०२४-२५ साठी शाळा दुरुस्तीसाठी ३ कोटी ६३ लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता. पालकमंत्री उदय सामंत यांनी यात लक्ष घालून हा निधी उपलब्ध करून दिला. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील २११ प्राथमिक शाळांच्या दुरुस्तीची कामे मंजूर झाली असून, त्यापैकी २०६ शाळांना कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. यातील १३० शाळांची दुरुस्ती पूर्ण झाली आहे, तर ४५ शाळांची कामे प्रगतीपथावर आहेत आणि ३१ शाळांची कामे अद्याप सुरू झालेली नाहीत.

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये ग्रामीण भागातील गरीब आणि सर्वसामान्य कुटुंबातील मुले शिक्षण घेतात. या शाळा आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज होत असल्या तरी अनेक शाळांच्या इमारती नादुरुस्त झाल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यासाठी मागील काही महिन्यांपूर्वी केलेल्या सर्वेक्षणानुसार २११ शाळांची दुरुस्ती आवश्यक असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार जिल्हा नियोजन समितीने साडेतीन कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. या निधीतून शाळांच्या इमारती दुरुस्त करून विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि दर्जेदार शिक्षणाचा अनुभव देण्याचे उद्दिष्ट आहे.

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने शाळांच्या दुरुस्तीसाठी वेळोवेळी शासनाकडे निधीची मागणी केली आहे. पालकमंत्री उदय सामंत यांनी याबाबत विशेष लक्ष घालून निधी उपलब्ध करून दिला. मात्र, अद्याप ३१ शाळांची दुरुस्तीची कामे सुरू होण्याची प्रतीक्षा आहे. शिक्षण विभागाकडून शाळांची गुणवत्ता सुधारण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात असून, मूलभूत सुविधांवर भर दिला जात आहे. तरीही काही शाळांच्या दुरुस्तीची कामे रखडल्याने स्थानिक पालकांमध्ये नाराजी आहे.

शिक्षण विभागाने येत्या काळात उर्वरित कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि आधुनिक वातावरणात शिक्षण घेता येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Advertisement