दक्षिण रत्नागिरीचे मनसे जिल्हा अध्यक्ष अविनाश सौंदळकर लवकरच भूमिका मांडणार!

रत्नागिरी: कोकणाचे शैक्षणिक क्षेत्रातील नाक समजले जाणारे व अनेक पुरस्कार प्राप्त दापोली स्थित डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या दक्षिण रत्नागिरी मधील काही कार्यालयासंदर्भात तक्रारी आल्या होत्या. त्या तक्रारी संदर्भात सखोल माहिती घेतली असता अनेक चुकीच्या गोष्टी संपूर्ण विद्यापीठातच सुरु आहेत, अशी माहिती आमच्या समोर येत आहे.

रत्नागिरी मत्स्य महाविद्यालय हे कृषी विद्यापीठ अंतर्गत असल्याने अनेक मर्यादा येत आहेत आणि म्हणूनच महाराष्ट्र नवनिर्माण सेना गेली कित्येक वर्षे कोकणासाठी स्वतंत्र्य मत्स्य विज्ञान विद्यापीठ व्हावे यासाठी पाठ पुरावा करत आहे.

मत्स्य विज्ञान विद्यापीठ होणे अत्यंतीक गरजेचे झाले आहे ही व दक्षिण रत्नागिरी मधील कार्यालयांमधील तक्रारी संदर्भात दापोली विद्यापीठ भेट दिली असता अधिकाऱ्याकडून त्या संदर्भात मोघम व अर्धवट उत्तरे, याच्या त्याच्या कडे बोटं दाखवण्या व्यतिरिक्त काहीच उत्तर मिळाले नाही.

या संदर्भात अधिक माहिती घेतली असता असे दिसून आले की, काही विशिष्ट लोकांना संपूर्ण विद्यापीठ आंदण मिळाल्या सारखे गोष्टी त्यांच्या कडून सुरु आहेत.

हा प्रकार नेमका काय आहे? तसेच समजलेल्या प्रकाराचे कागदपत्री पुरावे पाहून कोणाच्या पुढकाराने या गोष्टी सुरु आहेत?

या सर्व प्रकारात कोण कोण आहेत या सर्व प्रकाराची माहिती पुराव्यानिशी लवकरचं जनते समोर मांडू. तसेच समजलेले तक्रार खरी असेल व त्याचे सबळ पुरावे हाती आले तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना संबंधिताना घरी बसविल्या शिवाय गप्प बसणार नाही, असा इशारा मनसेचे दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर यांनी दिला आहे.