मुख्य बसस्थानकाच्या नूतन इमारतीचे लोकार्पण

रत्नागिरी : रत्नदूर्ग किल्ल्यावर जाण्यासाठी दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी लिफ्ट बसविण्यात येणार असून, त्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून 1 कोटी रुपये निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

बसस्थानक हे माझे घर आहे. त्याची निगा राखणे, ते निट निटके आणि स्वच्छ ठेवणे ही माझी जबाबदारी आहे, अशी भावना प्रत्येकांने ठेवली पाहिजे आणि इतरांनाही सांगितली पाहिजे, असे आवाहन पालकमंत्री डॉ.उदय सामंत यांनी केले.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्या विशेष निधीमधून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या येथील मुख्य बसस्थानकाच्या नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा आज झाला.

या कार्यक्रमास रोजगार हमी योजना, फलोत्पादन, खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले, महसूल, गृह राज्यमंत्री योगेश कदम, माजी आमदार राजन साळवी, उदय बने, अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षीत यादव आदी उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांमुळे राज्याला 500 कोटी परिवहन महामंडळाला मिळाले. रत्नागिरी जिल्ह्यासाठी 50 कोटी दिले. शिंदे साहेबांच्या नेतृत्त्वाखाली उद्योगमंत्री म्हणून या बसस्थानकाचे भूमिपुजन झाले ते पूर्णत्वास गेले.

आपण प्रवाशांना सुखसोयी देतो, त्याच पध्दतीने माझा कर्मचारी वातानुकुलित विश्रांतीकक्षात असला पाहिजे, हे सांगणारे हे बसस्थानक आहे. रत्नागिरीमधील स्थानकांचा कायपालट झाला. दापोलीच्या स्थानकासाठीही पैसे दिले जातील, असा शब्द पालकमंत्र्यांनी यावेळी दिला.

या नव्या बसस्थानकामध्ये सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार देण्याचा निर्णय घेतला आहे. कोकणी पदार्थ उत्पादनाच्या विक्रीसाठी काही गाळे दिले जातील. धूतपापेश्वर जीर्णोध्दारासाठी 12 कोटी निधी, कसबा संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराजांचे जागतिक स्तरावरील स्मारक होत आहे, असे सांगून पालकमंत्री म्हणाले, ग्रामीण भागांना जोडणारी लालपरी ही आपली आहे. बसस्थानक हे आपले घर आहे, ते स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी देखील आपली सर्वांची आहे.

फलोत्पादन मंत्री श्री. गोगावले म्हणाले, उदय सामंत हे राज्याला लाभलेले विकास रत्न आहेत. त्यांना रायगडच्यावतीनेही शुभेच्छा देतो. विकास कशा पध्दतीने करावयाचा, याचा प्रत्यय रत्नागिरीमध्ये आल्यावर होतोय. मिऱ्या नागपूर रस्ता, बंधारा आणि आता चांगलं सुंदर देखणं बसस्थानक दिले आहे. हे बसस्थानक स्वचछ ठेवणे तुमचे काम आहे.

महसूल राज्यमंत्री श्री. कदम म्हणाले, लोकप्रतिनिधी मतदार संघाला कसा न्याय देऊ शकतो, हे आज पाहायला मिळाले. याचे श्रेय सामंत साहेबांना जाते. दापोली खेड, मंडणगड येथील प्रशासकीय इमारती मंजूर करुन घेतल्या आहेत. त्यासाठी 120 कोटीपेक्षा जास्त निधीला मंजुरी मिळाली आहे. आजचे बसस्थानक हे राज्यात रोल मॉडेल म्हणून राबविण्यासारखे उभारले आहे. अधिकारी कर्मचाऱ्यांना चांगल्या सुविधा दिल्या तर, त्यांची मानसिकता सकारात्मक बनते. चांगले काम होते. अशा इमारती प्रत्येक तालुक्यात होणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.

फित कापून, कोनशिला अनावरण करुन बसस्थानकाचे लोकार्पण करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातील दीपप्रज्ज्वलन झाले. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमांचे अनावरणही करण्यात आले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचेही पुजन करण्यात आले. महामंडळाच्या प्रादेशिक व्यवस्थापक यामिनी जोशी यांनी प्रास्ताविक केले. एमआयडीसीचे अधिक्षक अभियंता कालिदास भांडेकर यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्‌रमाचे सूत्रसचालन पूर्वा पेठे यांनी केले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*