रत्नागिरी : समाजातील घडामोडींचा आढावा पत्रकार नेहमीच घेत असतात, आपल्या लेखणीने मदतही मिळवून देत असतात मात्र चिपळूणमधील पूराचे संकट पाहून सामाजिक जाणीवेतून रत्नागिरी मराठी पत्रकार परिषदेने याठिकाणी आपण समाजाचे काही देणे लागतो ही जाणीव ठेवून शुकवारी मदतीचा हात दिला.
रत्नागिरी मराठी पत्रकार परिषदेकडून यापूर्वीही अनेक सामाजिक उपक्रम घेण्यात आले आहेत. चिपळूण पूरस्थिती पाहता रत्नागिरी मराठी पत्रकार परिषदेने त्वरीत मदत देण्यासाठी पुढाकार घेतला. नेमक्या कोणत्या गोष्टी प्राथमिक स्वरूपात अत्यावश्यक आहे याची माहिती घेवून पाण्याच्या 500 बाॅटल, 150 बिस्कीट बॉक्स, चादर वाटण्याचा निर्णय घेण्यात आला.
शुकवारी परिषदेच्या राज्य महिला संघटक जान्हवी पाटील, माजी जिल्हाध्यक्ष हेमंत वणजू, कार्याध्यक्ष राजेश शेळके, प्रसिध्दी प्रमुख जमीर खलिफे, सामाजिक कार्यकर्ता कौस्तुभ दिक्षित यांनी चिपळूणात जावून मदत वाटप केले.
यावेळी हातखंबा येथील टेम्पोचालक रोहन जोशी यांनी सहकार्य केले. या उपक्रमाचे नियोजनसाठी जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण देवरुखकर, रत्नागिरी तालुकाध्यक्ष आनंद तापेकर सहकार्य केले.
यावेळी चिपळूणमधील काही पत्रकारांनाही पातिनिधिक स्वरूपात मदत करण्यात आले. यावेळी मंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव, आमदार राजन साळवी, माजी आमदार सदानंद चव्हाण यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
त्यानंतर शहरातील नागरिकांना पाणी व बिस्कीट वाटप करण्यात आले. पत्रकारांनी सामाजिक बांधिलकीतून केलेल्या उपक्रमानंतर अनेकांच्या मार्फत आणखीन मदत शनिवारी पाठवून देण्यात आली आहे. यापुढेही हे मदत कार्य सुरू राहणार असून इतर दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्थांनी विशेषत: पाणी, सॅनिटरी नॅपकीन, चादर, भांडी आणि किराणा सामान आदीची चिपळूणवासियांना सध्या अधिक गरज असून ज्यांना शक्य आहे त्यांनी हे साहित्य नेवून द्यावे असे आवाहन मराठी पत्रकार परिषदेकडून करण्यात आले आहे.