रत्नागिरी : तालुक्यातील सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागांतर्गत कुवारबाव येथील एका वसतिगृहामध्ये एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
अमित गणेश चव्हाण (वय २२, रा. राजापूर) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. गुरूवारी (ता. १३) रात्री ही घटना उघडकीस आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अमित चव्हाण हा शहरातील एका नामांकित महाविद्यालयात एसवायबीएचे शिक्षण घेत होता.
विद्यार्थ्यांना होळी सणाची सुटी असल्याने अमित चव्हाण हा बुधवारी रजा अर्ज देऊन वसतिगृहातून बाहेर पडला. घरी गेलेला अमित दुसऱ्या दिवशी गुरूवारी दुपारच्या सुमारास पुन्हा वसतिगृहामध्ये आला.
रूममध्ये आल्यावर त्याने रूमचा दरवाजा लावून घेत स्वतःला बंद करून घेतले होते. रूम बंद असल्याने इतर विद्यार्थ्यांनी दरवाजा ठोठावत त्याला आवाज देण्याचा प्रयत्न केला;
मात्र आतमध्ये असलेल्या अमितने कोणताही प्रतिसाद दिला नाही यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात संशय बळावला. तत्काळ विद्यार्थ्यांनी घटनेची माहिती येथील कर्मचाऱ्यांना दिली.
त्यांनी दरवाजा उघडताच अमित गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. या घटनेचा पुढील तपास पोलिस अधिकारी करत आहेत.