जिथं परिस्थिती नियंत्रणात आहे, तिथे नागरिकांना व्यापार उदिमाची पूर्णतः परवानगी देण्यात यावी -आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची मुख्यमंत्र्यांना विनंती

देशात आणि महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं थैमान घातलं. आता पश्चिम महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक कायम असला तरी राज्याच्या इतर भागात कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आली आहे. मात्र तरीही निर्बंध पूर्णतः शिथिल न झाल्यामुळे जनता त्रस्त आहे. एक तर हे निर्बंध पूर्णतः काढून पूर्ण दिलासा द्यावा किंवा पूर्ण आणि कडक लॉकडाऊन करावा, अशी विनंती आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर सरकारनं कोरोना नियंत्रणात असलेल्या जिल्ह्यांना सूट द्यायलाही सुरुवात केली होती. मात्र तीनच आठवड्यात सरकारनं मूळ धोरणावरून घुमजाव करत पुन्हा निर्बंध लागू केले. शहरांमध्ये तेव्हा नुकतेच सुरु होत असलेले मॉल्स आणि थिएटर्स पुन्हा बंद झाले. रात्रीपर्यंत सुरू असणारी दुकानं दुपारी ४ वाजता बंद करण्याचे निर्बंध लागू झाले. त्यामुळे सरकारवर व्यापारी वर्गातून नाराजी असल्याचं चित्र आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाची परिस्थिती गंभीर आहे, त्या भागात निर्बंध जाहीर करावेत, मात्र जिथं परिस्थिती नियंत्रणात आहे, तिथे नागरिकांना व्यापार उदिमाची पूर्णतः परवानगी देण्यात यावी आणि निर्बंध काढून टाकण्यात यावेत, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांनी ही बाब मान्य केली असून यावर अभ्यास करून ते लवकरच आपला निर्णय जाहीर करतील, असं टोपे यांनी म्हटलं आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*