खेड : प्रतिनिधी

मुंबई  – गोवा महामार्ग खेडमध्ये बाहेरून कामगार घेऊन येणाऱ्या 2 बसेसना आज मनसे कार्यकर्त्यांनी अडवलं. या कामगारांकडे कोणत्याही प्रकारचे कागदपत्र नसल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आलं. त्याचबरोबर ज्या परिसरात यांना ठेवण्यात येणार होतं, त्या भागातील ग्रामकृती समितीला याबाबत कळवण्यात आलेलं नव्हतं, अशी माहिती खेड तालुक्याचे मनसे प्रमुख संदीप फडकले आणि हेमंतराज बावदाने यांनी दिली.

राज्यात 31 जुलै पर्यंत लॉकडाऊन आहे मग हे कामगार रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येतात कसे ? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. लॉकडाऊन फक्त सर्वसामान्यांसाठीच आहे का? असा सवाल देखील त्यांनी प्रशासनाला विचारला आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी अडवलेले हे कामगार गुजरात येथून रत्नागिरी जिल्ह्यात आल्याचे समजते. यामध्ये साधारण 22 कामगारांचा समावेश आहे.

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. खेड लोटे येथील एमआयडीसी या भागांमध्ये काही कंपन्यांमधील बाहेरून येणारे मजूर यांच्यामार्फत संसर्ग होत असल्याचे मागील काही घटनांवरून दिसून आले आहे. यावरती कारवाई करावी व्हावी अशी मागणी मनसेने व इतर सामाजिक संघटना, राजकीय पक्ष यांनी वारंवार केली आहे. आता प्रशासन या कामगारांना बोलावणाऱ्या कंपनीवर कारवाई करेल का? हे पहावं लागणार आहे.

Advt.