दापोली : आर. व्ही. बेलोसे एज्युकेशन फाउंडेशन, दापोली संचलित वराडकर बेलोसे महाविद्यालयात गुरुवारी, १७ एप्रिल २०२५ रोजी सुनीता दिलीप बेलोसे लिखित ‘काव्यलीला’ या कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा उत्साहपूर्ण आणि उत्सवी वातावरणात संपन्न झाला.

कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली. मराठी विभागप्रमुख उत्तम पाटील यांनी प्रास्ताविकात कवयित्री सुनीता बेलोसे यांच्या सर्जनशील प्रवासावर प्रकाश टाकला आणि त्यांच्या संवेदनशील लेखनशैलीचे कौतुक केले.

काव्यलीला या कवितासंग्रहाचे प्रकाशन ‘माय कोकण’चे संपादक आणि सुनीता बेलोसे यांचे माजी विद्यार्थी मुश्ताक खान यांच्या हस्ते झाले. यानंतर गायक निलकंठ गोखले यांनी संग्रहातील निवडक कविता सादर करत उपस्थित रसिकांची मने जिंकली.

मुश्ताक खान, ज्यांनी शाळेत सुनीता बेलोसे यांच्याकडून गणित आणि विज्ञानाचे धडे घेतले, यांनी आपल्या मनोगतात त्यांच्याबद्दलच्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा दिला.

ते म्हणाले, “गणित आणि विज्ञान शिकवणाऱ्या बेलोसे मॅडम उत्तम कविता लिहितात हे आम्हाला उशिरा कळलं. त्यांनी अतिशय सुंदर कविता रचल्या आहेत.

निसर्ग, नातेसंबंध किंवा राजकीय विषयांवर असणाऱ्या या कविता ‘आईला कळेल’ या शब्दांतून भावनिकरीत्या व्यक्त झाल्या आहेत.

या कविता खूप लोकप्रिय होतील.” त्यांनी सुनीता बेलोसे यांना भावी वाटचालीसाठी अभिनंदन आणि शुभेच्छा दिल्या.

प्रमुख पाहुण्यांमध्ये फाउंडेशनचे संचालक विजय बेलोसे, महाविद्यालयाचे प्राचार्य भारत कर्‍हाड आणि ज्येष्ठ साहित्यिक इक्बाल मुकादम उपस्थित होते.

इक्बाल मुकादम यांनी सुनीता बेलोसे यांच्या कवितांचे कौतुक करताना सांगितले की, त्यांनी सुनीता यांना सुरुवातीपासून कविता लेखनासाठी प्रोत्साहन दिले आणि त्यांना सातत्याने लिहित राहण्यासाठी प्रेरित केले. यावेळी त्यांनी साहित्यप्रकारांबाबत उपस्थित रसिकांना माहिती दिली.

सर्व मान्यवरांनी काव्यलीला संग्रहातील भावस्पर्शी कविता, ग्रामीण अनुभवांची प्रभावी मांडणी आणि संवेदनशील लेखनशैलीची मुक्तकंठाने प्रशंसा केली.

फाउंडेशनचे सभापती धनंजय यादव यांनी अध्यक्षीय भाषणात संस्थेच्या शैक्षणिक उपक्रमांची माहिती देत शिक्षणप्रेमींना आर्थिक सहाय्याचे आवाहन केले.

प्राचार्य भारत कर्‍हाड यांनी आपल्या सखोल समीक्षेत म्हटले, “काव्यलीला म्हणजे स्त्रीमनाच्या कोमलतेचा, वेदनांचा आणि आत्ममंथनाचा सर्जनशील प्रवास आहे.

शिक्षिकेच्या लेखणीतून उमटणारे सामाजिक भान आणि भावनिक अनुभव वाचकांच्या मनाला स्पर्श करतात.” त्यांनी पुढे नमूद केले की, “अलीकडे बोलण्याची सोय कमी झाली असताना, आमच्या महाविद्यालयात साहित्यिकांना मुक्तपणे व्यक्त होण्याची संधी आहे.”

कवयित्री सुनीता बेलोसे यांनी आपल्या मनोगतात लेखन हे सामाजिक संवादाचे प्रभावी माध्यम असल्याचे सांगितले.

‘काव्यलीला’ हे शीर्षक त्यांच्या आई लीला यांच्या स्मृतीस समर्पित असल्याचे नमूद करत त्यांनी मायलेकीच्या नात्याचा भावस्पर्शी संदर्भ उपस्थितांसोबत शेअर केला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मानसी मुळे यांनी तर आभार प्रदर्शन दीपक गडकर यांनी केले.

काव्यलीला मधील कविता केवळ वैयक्तिक भावना व्यक्त करणाऱ्या नसून सामाजिक वास्तव, स्त्रीजीवनाची गुंतागुंत आणि मानवी नातेसंबंधांचे नाजूक पैलू यांना स्पर्श करणाऱ्या आहेत.

या प्रकाशन सोहळ्याने एका नव्या प्रतिभावान कवयित्रीचा साहित्यिक अविष्कार सर्वांसमोर आणला.