प्रीपेड वीज मीटर विरोधात ‘शिवसेना उबाठा’ आक्रमक

रत्नागिरी:- जिल्ह्यात स्मार्ट मीटर बसवण्याच्या निर्णयाला विरोध दर्शवत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. त्यांनी महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांना घेराव घालत जोरदार निदर्शने केली.

शिवसेना तालुकाप्रमुख शेखर घोसाळे यांच्या नेतृत्वाखाली ही मोर्चेबांधणी करण्यात आली. यावेळी शहर प्रमुख प्रशांत साळुंखे, प्रसाद सावंत, आदित्य, तसेच शेकडो शिवसैनिक महावितरणच्या कार्यालयात धडकले. कार्यकर्त्यांनी स्मार्ट मीटरसंदर्भात नागरिकांच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेत, हा निर्णय त्वरित मागे घ्यावा अशी मागणी केली.

स्मार्ट मीटरबाबत जनतेत अस्वस्थता
महावितरणकडून जिल्ह्यात स्मार्ट मीटर बसवण्याचा निर्णय घेतला जात आहे. परंतु, अनेक नागरिकांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे. वाढीव वीजबिल, चुकीच्या गणनामुळे होणारे नुकसान आणि ग्राहकांवर पडणारा अतिरिक्त आर्थिक भार यामुळे स्मार्ट मीटरला मोठा विरोध आहे.

शिवसेना कार्यकर्त्यांनी महावितरण अधिकाऱ्यांना घेराव घालत, “जनतेवर अन्याय होऊ देणार नाही”, असा इशारा दिला. “जर जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसवण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही उग्र आंदोलन करू”, असा इशारा तालुकाप्रमुख शेखर घोसाळे यांनी दिला.

महावितरण अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया
या आंदोलनानंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी आंदोलकांशी चर्चा करत त्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्या. “स्मार्ट मीटरबाबत सरकारच्या निर्देशानुसारच पुढील प्रक्रिया केली जात आहे. मात्र, नागरिकांच्या समस्या लक्षात घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत हा मुद्दा पोहोचवला जाईल”, असे त्यांनी आश्वासन दिले. शिवसेनेच्या या आक्रमक भूमिकेमुळे स्मार्ट मीटरचा विषय अधिक गडद झाला आहे. आता प्रशासन यावर काय निर्णय घेते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*