मुंबई : राज्य परिवहन महामंडळानं एस.टी. बसमध्ये स्वच्छता राखण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. यापुढे एस.टी. बस अस्वच्छ आहेत तर थेट आगार व्यवस्थापकांना जबाबदार धरलं जाईल. एवढंच नाही त्यांना पाचशे रूपयांचा दंड देखील ठोठावण्यात येईल अशी तरतूद एसटी महामंडळानं ठेवली आहे.

राज्यात स्वच्छ एस. टी. स्थानक या मोहिमेनंतर एस.टी. गाड्यांच्या स्वच्छतेसाठी आता ही नवी मोहीम सुरू करण्याचा निर्णय एस.टी. महामंडळानं घेतला आहे. एस.टी. बसच्या स्वच्छतेबाबत महामंडळ अतिशय गंभीर आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा खपून घेतला जाणार नाही, असं महामंडळानं जाहीर केलं आहे.

गांधी जयंतीच्या आदल्या दिवसापासून म्हणजेच 1 ऑक्टोबरपासून एस.टी. बसेसची ही तपासणी मोहीम हाती घेण्यात येणार आहे.

सध्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बस स्थानक मोहीम सुरू आहे. या मोहिमेला पाच महिने उलटल्याने आता बसमधील अस्वच्छतेवर महामंडळाने लक्ष केंद्रित केले आहे.

यापूर्वी एस.टी‌. बसच्या स्वच्छतेसाठी वारंवार लेखी सूचना देऊन देखील कार्यवाही होत नसल्याने आता थेट आगार व्यवस्थापकावर गाड्यांच्या स्वच्छतेची जबाबदारी निश्चित करून दंडात्मक कारवाई करण्याची तरतूद करण्यात आली आहे.

एखादी बस मुक्कामी असल्यास त्या बसच्या स्वच्छतेची जबाबदारी संबंधित आगार व्यवस्थापकांची असणार आहे, असे महामंडळातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

एस. टी. बस तपासणीसाठी मुख्यालयाकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांचं एक पथक तयार करण्यात आलं आहे. या पथकाला महिन्यातून १५ बसची तपासणी करून त्यांना गुण देण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. या तपासणीत ज्या बसेसना कमी गुण मिळतील त्या संबंधित आगार व्यवस्थापकाला पाचशे रुपये दंड ठोठावण्यात येईल.

या मोहिमेची माहिती आगार व्यवस्थापकांनी राज्यातील सर्व विभागप्रमुखांना देण्याच्या सूचना मुख्यालयाने केल्या आहेत.

बेस्ट, नवी मुंबई परिवहन, कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळ, गोवा राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्या गाड्यांच्या तुलनेत एसटीत अधिक अस्वच्छता दिसून येते.

वारंवार परिपत्रक पाठवून, बैठका घेऊन, सूचना देऊनदेखील एस.टी. बसेसच्या स्वच्छतेबाबत स्थानिक प्रशासनाकडून गंभीरतेने कार्यवाही केली जात नाही. यामुळेच दंडात्मक कारवाईचा निर्णय घेण्यात आला आहे.