नवी दिल्ली – डिसेंबर महिन्यात आत्तापर्यंत विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय मार्केट मधील 17 हजार 696 कोटी रूपयांची गुंतवणूक काढून घेतली आहे. कोविडच्या नवीन विषाणुंचा प्रादुर्भाव आणि अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह विषयीची अस्थिरतेची स्थिती याचा हा परिणाम असल्याचे मानले जात आहे.
विदेशी गुंतवणूकदारांनी जी गुंतवणूक काढून घेतली आहे त्यातील 13 हजार 470 कोटी रूपये इक्विटी मधील आहेत तर 4 हजार 66 कोटी रूपये डेट सिग्मेंट मधील आहेत. नोव्हेंबर मध्ये विदेशी गुंतवणूकदारांनी 2 हजार 521 कोटी रूपये काढून घेतले होते.
गुंतवणूक तज्ज्ञ हिमांशु श्रीवास्तव यांनी सांगितले की सध्या जागतिक तसेच डोमेस्टीक मार्केट मध्ये अस्थिरतेचे वातावरण आहे. ते म्हणाले की ओमायक्रॉनच्या धास्तीमुळे गुंतवणुकीचे वातावरण अधिकच अस्थिर झालेले दिसत आहे. ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव आणखीन वाढला तर भारतातून पुढील काळात आणखी गुंतवणूक काढून घेतली जाण्याची शक्यता आहे असेही त्यांनी म्हटले आहे.