६४ व्या राज्य नाट्य स्पर्धेत रत्नागिरीच्या मिनार पाटीलला अभिनयाचे प्रथम पारितोषिक

‘अग्निपंख’ नाटकातील कामगिरीची मोहोर

रत्नागिरी : येथील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर नाट्यगृहात पार पडलेल्या ६४ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेत रत्नागिरीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

समर्थ रंगभूमी, रत्नागिरी संस्थेच्या वतीने सादर करण्यात आलेल्या आणि प्र. ल. मयेकर लिखित ‘अग्निपंख’ या नाटकातील दमदार अभिनयासाठी रत्नागिरीचा सुपुत्र तथा नवोदित अभिनेता मिनार गजानन पाटील याला राज्यस्तरीय उत्कृष्ट अभिनयाचे प्रथम पारितोषिक (रौप्यपदक) प्राप्त झाले आहे.

जिल्हा स्तरावरील स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून या नाटकाने राज्य स्तरावर धडक मारली होती, जिथे राज्यभरातील तब्बल ४७ संघांशी त्यांची मोठी चुरस होती.

दिग्दर्शक ओंकार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सादर झालेल्या या नाटकात मिनारने आपल्या अभिनयाची विशेष छाप पाडत परीक्षकांची मने जिंकली आहेत.

मिनार पाटील यांनी गेल्या अनेक वर्षांपासून नाट्य क्षेत्रात आणि मराठी मालिकांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.

त्यांच्या या यशाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असतानाच, स्थानिक नाट्यप्रेमींमध्ये निकालाबाबत काही प्रमाणात संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

जिल्हा स्तरावर ‘अग्निपंख’ नाटकाने सर्वच विभागांत उत्कृष्ट कामगिरी केली होती, त्यामुळे राज्य स्तरावरही या नाटकाकडून मोठ्या सांघिक पुरस्कारांची अपेक्षा रसिकांना होती.

मात्र, जाहीर झालेल्या निकालात अभिनयाचे मुख्य पारितोषिक वगळता इतर तांत्रिक आणि कलात्मक विभागांत अपेक्षेप्रमाणे यश न मिळाल्याने रत्नागिरीतील रसिक प्रेक्षकांमध्ये काहीसा भ्रमनिरास झाल्याची चर्चा आहे.

असे असले तरी, इतक्या मोठ्या स्पर्धेत एका कोकणपुत्राने अभिनयाचा प्रथम क्रमांक पटकावणे ही जिल्ह्यासाठी मोठी अभिमानाची बाब मानली जात आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*